मोदींकडून शिंदे-फडणवीसांचे कौतुक ; म्हणाले, हे डबल इंजिन सरकार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृध्दी महामार्गासह अनेक प्रकल्पाचे लोकर्पण करण्यात आले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीसांचे कौतुक केले आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी 11 नक्षत्रांचा एक मोठा नक्षत्र उदयास येत आहे. डबल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात किती वेगाने काम करत आहे, याचाच आजचा प्रसंग पुरावा आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत करुन गणरायाला अभिवादन केले.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात असल्याने टेकडीच्या गणपती बाप्पाला मी वंदन करतो. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर कमी होणार असून महाराष्ट्रातील २४ जिल्हे आधुनिक कनेक्टिव्हिटीने जोडण्यात येणार आहेत. यामुळे शेतकरी, भाविक आणि उद्योगांना मोठा फायदा होईल. तसेच, रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
स्वातंत्र्याच्या ‘अमृत काल’मध्ये विकसित भारताचा महान संकल्प घेऊन देश पुढे जात आहे. भारताची सामूहिक शक्ती हा विकसित भारत घडवण्याचा मार्ग आहे. राष्ट्राच्या विकासासाठी राज्याचा विकास हाच विकसित भारत घडवण्याचा मंत्र आहे. गेल्या 8 वर्षात आम्ही आमची विचारसरणी आणि दृष्टीकोन दोन्ही बदलले आहेत. आम्ही ‘सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ यावर भर देत आहोत. मी जेव्हा ‘सबका साथ’ म्हणतो तेव्हा त्यात प्रत्येक देशवासीय आणि राज्याचा समावेश होतो. लहान असो वा मोठा, प्रत्येकाची क्षमता वाढेल तरच भारत विकसित होईल, असेही त्यांनी म्हंटले होते.
ते पुढे म्हणाले, ३०-३५ वर्षांपूर्वी या धरणाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण, विलंबामुळे गोसेखूर्द प्रकल्पाचा खर्च १८ हजार कोटींवर गेला. २०१७ मध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर या धरणाचं काम वेगाने सुरु आहे. सर्व समस्या सोडवण्यात आल्या आहेत. या वर्षी हे धरण पूर्ण भरलं याचा आनंद आहे.
पहिल्या औद्योगिक क्रांतीचा फायदा आपण घेऊ शकलो नाही. दुसऱ्या-तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत मागे राहिलो. पण, आज चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ आली असताना भारताला ते चुकणे परवडणारे नाही.
शॉर्टकट राजकारणाची ही विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्ट कट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणं हाच यांचा हेतू असतो. खोटी आश्वासनं देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देशाचं निर्माण करु शकत नाहीत. आज मी भारतातील प्रत्येक तरुणाला विनंती करेन, मी प्रत्येक करदात्याला विनंती करेन, अशा स्वार्थी राजकीय पक्षांचा आणि स्वार्थी राजकीय नेत्यांचा पर्दाफाश करा.
आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया, असा खोडसाळपणा करून जे धावत आहेत. ते या देशाला आतून पोकळ बनवतील. कोणताही देश शॉर्टकटने चालत नाही. देशाच्या प्रगतीसाठी, शाश्वत विकासासाठी, शाश्वत उपायांसाठी काम करणे, दीर्घकालीन दृष्टी खूप महत्त्वाची आहे, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली.