आदिवासी हेच देशाचे मालक, भाजपकडून त्यांची ओळख पुसण्याचे काम सुरू ; राहुल गांधी यांचे टीकास्त्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शेगाव :- आदिवासी हे देशाचे मालक आहेत पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत ते आदिवासी नाही तर कायम जंगलातच रहावेत म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचे काम भाजपा करत असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.
आदिवासी हे काँग्रेससाठी आदिवासी (Tribal) आहेत आणि आदिवासीच राहतील. जल, जंगल जमीनचा अधिकार तर तुम्हाला मिळालाच पाहिजे पण त्याबरोबर शिक्षण व आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
‘भारत जोडो यात्रा'(Bharat Jodo Yatra) आज जळगाव जामोदमध्ये होती. महाराष्ट्रातील या यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. या दरम्यान, राहुल गांधी यांनी ‘लोकसंघर्ष’ मोर्चाने आयोजित केलेल्या आदिवासी-कष्टकरी महिला मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात हजारो आदिवासी-कष्टकरी महिला उपस्थित होत्या. राहुल गांधी यांनी म्हटले की, आदिवासींची संस्कृती, इतिहास देशासाठी महत्वाचा आहे. पर्यावरणाशी तुमचे नाते घट्ट आहे आणि ते महत्वाचे आहे. आदिवासींची भाषा, कपडे व जगण्याचा अंदाज वेगळा आहे पण तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाहीत, आपल्यातीलच एक आहात. काँग्रेसच्या सरकारच्या काळात आदिवासींसाठी पेसा कायदा, वन हक्क कायदा आणला गेला. सरकारने तुम्हाला ही भेट नाही दिली. तर, हा तुमचा हक्कच होता आणि काँग्रेस सरकारने तो दिला असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
वनवासी नव्हे आदिवासी
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, या जमिनीवर पहिले पाऊल आदिवसांनी टाकले. पण पंतप्रधान आदिवासींसाठी ‘वनवासी’ नवा शब्द उच्चारतात. आदिवासी व वनवासी या दोन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आदिवासी मालक आहेत. तर, वनवासी म्हणजे जंगलमध्ये राहणारा म्हणजेच शहरात राहू न शकणारा, शिक्षण न मिळू शकणारे असा आहे. जंगल संपले तर तुमचे अस्तित्वही संपेल आणि पंतप्रधान तुमच्या हक्काचे जंगल काही उद्योगपतींना देत आहेत. तुमच्या अस्तित्वावर घाला घातला जात असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
काँग्रेस पक्षाने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण देऊन राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व दिले. महिला, आदिवासी, दलित, वंचित समाज घटकाला न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपाचा युवती, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बलात्काराला मुलींचे कपडे जबाबदार असल्याचे सांगत मुलींनाच चूक ठरवले जाते. बलात्कार कपड्यामुळे होत नाहीत त्यात मुलीची चुक नसते जर कोणी गुन्हेगार असेल तर तो बलात्कारीच दोषी असतो. मात्र, भाजपावाले महिलांचा सन्मान न करता त्यांचा अपमान करत असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
आदिवासी-कष्टकरी महिला मेळाव्याला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री खासदार दिग्विजयसिंह, महिला काँग्रेस अध्यक्ष नेट्टा डिसूझा, प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव आदी उपस्थित होते.