राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडून उद्या औरंगाबाद मार्गे सुरतला जाणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास सुरू असतांना अचानक राहुल गांधी यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला असून उद्या ते औरंगाबादेत येणार आहेत.
दुपारी बारा वाजता भारत जोडो यात्रेतून ते औरंगाबादला आणि चिकलठाणा विमानतळावरून खाजगी विमानाने सुरतला जाणार आहेत. त्याचा सुरत दौरा अचानक कशासाठी? याबद्दल मात्र गुप्तता पाळण्यात येत आहे.
राहुल गांधी यांनी विदर्भातील भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यात आणि देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपसह इतर विरोधकांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अशाचत गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. काॅंग्रेस पक्ष देखील मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरला आहे.
काॅंग्रेसचे सर्व बडे नेते हे भारत जोडो यात्रेत अडकल्यामुळे गुजरात मधील आतापर्यंतचा प्रचार हा स्थानिक नेत्यांच्याच भरवशावर होता. परंतु आता काॅंग्रेसेने चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने गुजरातच्या प्रचारात रंगत येणार आहे. राहुल गांधी यांचा अचानक आखण्यात आलेला सुरत दौरा या प्रचाराचाच एक भाग असल्याची चर्चा आहे.
काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांनी दिलेल्या माहितीनूसार राहुल गांधी उद्या औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. साडेअकरा ते बाराच्या दरम्यान हेलिपॅडने औरंगाबाद विमानतळ व तिथून खाजगी विमानाने ते सुरतला जाणार आहेत.
संध्याकाळी खाजगी विमानाने पुन्हा औरंगाबाद विमानतळ व तेथून जामनेरला पुन्हा भारत जोडो यात्रेत ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, याचवेळी सायंकाळी साडेपाच वाजता राहुल गांधी यांचे स्वागत स्थानिक काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.