राज्यातील काँग्रेससमोर नवे आव्हान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्य भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला असताना हिंदुत्वाच्या संघर्षाचा पारंपरिक राजकीय बिगूल वाजला आहे. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेले विधान महाराष्ट्राचा अवमान असल्याचा दावा करत भाजप, मनसे आणि शिंदे गटाने हिंदुत्वाच्या राजकिय प्रचाराची पायाभरणी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष्य करण्याची त्यांची रणनिती आहे.
सावरकर वादात काँग्रेस विरुद्ध भाजप हा राजकीय संघर्ष कायम असला तरी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहभागी असल्याने हिंदुत्वाच्या मुद्यावर या गटाचीच कोंडी करण्याचे डावपेच आहे. भाजपसाठी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या महानगरांमधील महापालिका महत्वाच्या आहेत. या प्रमुख महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे. मात्र यावेळी ठाकरे यांच्या शिवसेने विरोधात भाजप-मनसे-शिंदे गटाची एकी आहे.
शिवसेनेपुढे पेच
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशाकडे होत असली तरी राज्यात काँग्रेसला त्यांच्या वक्तव्याचा सामना करावा लागणार आहे. सावरकर यांच्यावरून भाजप आणि मनसे आक्रमक असताना काँग्रेसला राहुल गांधी यांचे समर्थन करताना शिवसेनेला सोबत घेणे अडचणीचे आहे. दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेससोबत एकत्र जाताना सावरकर यांच्याबाबत भूमिका कायम ठेवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
विनाकारण वाद नको; अजित पवार
बारामती, ता. १९ ः राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे असताना नको त्या गोष्टीवर वादविवादाला अर्थ नाही, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन सध्या सुरु असलेल्या वादाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांची भूमिका आज मांडली. सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी तुटण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता, ” जोपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरे व सोनिया गांधी यांचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडीला कसलाही धोका नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.