होय मी बदला घेतला, बेईमानाला जागा दाखवलीच पाहिजे ; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप-शिवसेनेचे युती तुटल्यानंतर अडीच वर्षात मनात जे काही साचलं होतं हे सगळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलून दाखवलं आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे.
यावर बोलताना शिवसेनेला (ठाकरे गट) उद्देशून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं की, माझ्यासोबत तुम्ही बेईनामी कराल तर होय मी बदला नक्कीच घेईन. साम टीव्हीच्या ‘सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा – मंथन विकासाचे’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
तुमच्यासोबत २४ तास राहणारा व्यक्ती, तुमच्यासोबत सत्ता भोगणार व्यक्ती, तुमच्यासोबत निवडून आलेला व्यक्ती हा थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो त्यावेळी राजकारणात जीवंत राहून त्याला ते परत करावं लागतं. नाहीतर तुम्ही राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलंच राहिलं पाहिजे. पण तुमच्या चांगुलपणाचा कुणी फायदा घेत असेल तर बेईमानाला जागा दाखवलीच पाहिचे. त्यामुळे होय मी बदला घेतला आणि मला त्याचा अभिमान आहे.
भाजप आणि ठाकरे गट कधीही एकत्र येणार नाही
उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे नुकसान करून घेतले आहे. माझी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक दुश्मनी नाही. आम्ही राजकीयदृष्ट्या दूर गेलो पण आता मनही जवळ येणार नाही. आता आम्ही यापुढे कधीही एकत्र येणार नाही, तशी परिस्थिती नाही. राजकारणात कुणीही कोणाला संपवू शकत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला पूर्णपणे बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
माझा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही
शिवसेनेसोबत युती करण्याची कोणतीही परिस्थिती सध्या नाही. कारण आता मनं दुखावली आहेत. दोन पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्र येऊ शकतात. मात्र मनं दुखवली असताना हे शक्य होणार नाही. उद्धव ठाकरे आणि आणि आम्ही एकत्र बसू पण कार्यकर्त्यांना ते मान्य होणार नाही. कार्यकर्त्यांनी अडीच वर्षात जे भोगलंय, निवडून आल्यानंतर विरोधी पक्षात बसलेत. आमचा रोज होणार अपमान त्यांनी पाहिलाय. दोन अडीच वर्षात माझा वैयक्तिक अपमान करण्याची कोणतीही संधी त्यांनी सोडली नाही. मात्र आता आम्ही पुढे गेले आहोत. आता आम्ही मोठे आहोत, ते लहान आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.