जितेंद्र आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही तासानंतर दुसरा गुन्हा नोंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघतांना दिसून येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा नोंदवल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील मतदारसंघात रविवारी एका उड्डाणपूलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात आलेल्या भाजपच्या एका महिला कार्यकर्ताने जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलाय. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. महिलेच्या या आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड व्यथित झाले आहेत. त्यांनी आपल्या आमदाराकीचा थेट राजीनामा आपल्या पक्षाच्या अध्यक्षांकडे पाठवला. यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, आम्हाला, पक्षातील सर्वांना जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा नकोय. ते महाराष्ट्र विधानसभा आणि राज्यातील एक उभरते नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देवू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
माझ्यावरचा गुन्हा हा षडयंत्राचा भाग – आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. एकवेळ माझ्यावर खुनाचा गुन्हा चालेल. पण विनयभंगाचा गुन्हा चालणार नाही. माझ्यावरचा गुन्हा हा षडयंत्राचा भाग आहे. कोणत्याही कायद्याचे पालन न करता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. मला ते कलम लावण्यात आल्याने वाईट वाटते. माझ्या खुनाचे प्लानिंग झाले असते तर वाईट वाटले नसते. ते माझ्यासाठी गौण आहे. पण 354 कलम काळजाला लागले आहे. 376 आणि 354 साठी मी जन्माला आलो नाही, असे आव्हाड म्हणाले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा – सुप्रिया सुळे
राज्यातील वातावरण अस्थिर झाले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असू शकतो. किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, जितेंद्र आव्हाड याचे विधानसभेतील काम चांगले आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, पक्ष त्यांच्या नेहमी पाठीशी आहे.
आव्हाडांचे निलंबन करा – बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आता जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. शरद पवार यांना विनंती आहे, की आव्हाड यांचे निलंबन करा, असे ते म्हणाले. कोणी आव्हाड यांचे समर्थन करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवे. आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुटेजही आहे, असेही ते म्हणाले.