चुकीची वक्तव्ये करून वातावरण गढूळ केले जातेय ; अजित पवार यांचा आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- जाणूनबुजून काहीतरी चुकीची वक्तव्ये करायची आणि राज्यातील वातावरण गढूळ करायचे असा प्रयत्न काही राजकीय नेत्यांकडून होत असल्याचा आरोप करतानाच, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज व्यक्त केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात निषेधाचे पडसाद उमटले होते. त्यावर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
अजित पवार यांनी बारामती येथील विविध विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. त्याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्रातील वडीलधाऱया नेत्यांनी कधीही आपल्याला अशा प्रकारची चुकीची वक्तव्ये करणे शिकवले नाही. कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रमुख, नेते किंवा प्रवक्त्यांकडून अशी आक्षेपार्ह वक्तव्ये केली जाऊ नयेत’ असे ते म्हणाले.
‘भारत जोडो’ यात्रेतील सहभागाबद्दल मंगळवारी बोलणार
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, ‘यापूर्वी अनेक पक्षांच्या नेत्यांनी अशा यात्रा काढून जनमताचा कौल घेतला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार होते, परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जाता आले नाही. पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदी यात्रेत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते. माझी यासंदर्भातील भूमिका मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये मांडेन’, असे अजित पवार म्हणाले.
न्यायप्रविष्ट गोष्टींबद्दल बोलणे योग्य नाही
अनिल देशमुख यांना अद्याप जामीन मिळालेला नाही असे प्रसारमाध्यमांनी यावेळी अजित पवार यांना विचारले. त्यावर ‘ही न्यायालयीन बाब असून न्यायप्रविष्ट गोष्टींबद्दल बोलणे योग्य नाही. हा न्यायव्यवस्थेचा अधिकार आहे.’ असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकीचे वर्तवलेले भाकीत हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही ते म्हणाले.