शिंदे-फडणवीसांमध्ये पुन्हा रात्रीच्या बैठकांचे सत्र सुरू ; राजकीय घडामोडींना वेग…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पुन्हा एकदा रात्रीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कुठल्या विषयावर चर्चा सुरू आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, राजकीय घडामोडींना मात्र वेग आल्याचे बोलले जात आहे.
राजकारणात एखादा विषय पेटला की, तो पेटत जातो. त्यानंतर त्याला फाटे फुटतात. आणि मग तो त्याची धग मात्र कायम असते. मात्र कालांतराने दुसरा विषय पेटला की, पहिला विषय मागे पडतो, असे दिसून येते. सध्या देखील महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक विषय पेटला आहे. तो म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामधील वाद होय. त्याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत निश्चितपणे हा विषय चर्चेला गेला, असे म्हटले जाते.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा विषय कालपासून महाराष्ट्रात अक्षरश: पेटवत ठेवला आहे. अब्दुल सत्तार यांनी ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच बदनामी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले आहेत. तर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्याचे आपण समर्थन करणार नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून त्यांना चांगली समज दिली, तसेच मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना तातडीने सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या सर्व प्रवक्त्यांची बैठक बोलावली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कालपासून हा मुद्दा प्रचंड तापवला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची रात्री उशिरा बैठक झाली या बैठकीत अब्दुल सत्तार यांचा मुद्दा निश्चितच चर्चेला गेला असावा.
त्याचप्रमाणे सध्या गाजत असलेले काही मुद्दे देखील चर्चेला गेले असावेत, त्यात प्रामुख्याने खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दोन चित्रपटांसंबंधी व्यक्त केली नाराजी, त्यानंतर जिथे जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर पुन्हा एकदा केलेली टीका, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात भारत जोडो यात्रे निमित्त १५ दिवसांसाठी झालेले आगमन, यासह अन्य मुद्द्यावर देखील चर्चा झाली असावी.
विशेषतः शिंदे गटाचे मंत्री आणि नेते व आमदार वारंवार काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात, विशेष म्हणजे अब्दुल सत्तार आमदार बांगर यांनी अलीकडच्या काळात अत्यंत बेजाबाबदार वक्तव्य आणि वर्तन केले त्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी गंभीर दखल घेतल्याचे दिसून येते आणि तो मुद्दा त्यांच्या बैठकीत चर्चेला गेल्याचे सांगण्यात येते. या प्रश्री त्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचे किंवा हा वाद शांत करण्यासाठी काय केले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांनी काल सोमवारी सकाळी सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अवघ्या काही तासांमध्ये या आंदोलनाचे लोण मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे अशा विविध भागांमध्ये पसरले. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन केले. तर अब्दुल सत्तार यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान आणि औरंगाबाद येथील घरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक मारली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा वर्षावर दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. कारण राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा रात्री उशीरा तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला. विशेष म्हणजे थोड्यावेळाने तोच शो मनसेचे अविनाश जाधव यांनी पुन्हा सुरु केला. या सगळ्या घडामोडींनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिर्घ बैठक झाली आहे.