शिवसेनेला खरंच दिली होती CM पदाची ऑफर? फडणवीसांनी पहिल्यांदाच केला गौप्यस्फोट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीत अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन पाळलं गेलं नाही, म्हणून आम्ही भाजपसोबतची युती तोडली असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कायम करण्यात येतो.
पण नक्की काय घडलं होतं? भाजपनं खरंच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.
फडणवीस म्हणाले, “आमच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर दहा वेळा ही घोषणा केली होती की, २०१९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल. पंतप्रधानांसह अमित शहा आणि आमच्या सर्व मोठ्या नेत्यांनी ही घोषणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे देखील टाळ्या वाजवत होते. इतकचं नव्हे तर उद्धव ठाकरेंनी स्वतःही घोषणा केली होती. त्यामुळं सर्वांनी मिळून केवळ पंतप्रधानाच नव्हे शिवसेना आणि भाजपनं मिळून मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत केलं होतं. पण युती होऊन निकाल समोर आल्यानंतर अचानक त्यांच्या असं लक्षात येतं की, शिवसेनेला मतंच अशी पडलीत की, तीन पक्ष एकत्र आले तर आपला मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळं अचानक उद्धव ठाकरेंनी आपला पवित्रा बदलला”
मुख्यमंत्रीपदाऐवजी दिली पालघरची जागा
“मी हे पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो की, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्यायचं कधीही ठरलं नव्हतं. मी यापुढं जाऊन काही तथ्य देखील सांगतो. निवडणुकीपूर्वी जेव्हा त्यांनी ही अट ठेवली तेव्हा आम्ही त्यांना स्पष्टपणे नकार देत, ही युती होणार नाही असं सांगत आम्ही बैठकीतून निघून गेलो. त्यानंतर तीन दिवसांनंतर आम्ही पुन्हा एकदा बैठक घेतली आणि मुख्यमंत्रीपदाऐवजी आमची पालघरची जागा उमेदवारासह आम्ही शिवसेनेला दिली, त्यानंतर आमची युती झाली. त्यामुळं हे शंभर टक्के स्पष्ट होतं की, मुख्यमंत्रीपद त्यांना देण्यात येणार नव्हतं”
आम्हाला असं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद नको
पण आमच्यामध्ये हे नक्की बोलणं झालं होतं की, गेल्यावेळी शिवसेनेला आम्ही कमी मंत्रीपदं दिली होती त्यामुळं यावेळी जास्त मंत्रीपद देऊ. त्यांनी दोन-तीन मंत्रीपदं अधिकची मागितली होती ती सुद्धा त्यांना देण्याचं आम्ही मान्य केलं. पण मुख्यमंत्रीपदाबाबत कधीही आश्वासनं दिलं नव्हतं. जर आम्ही खरंच वचन दिलं असतं तर त्यांना ते देऊ केलं असतं. कारण बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केलं होतं, त्याप्रमाणं त्यांच्याकडे कमी जागा असतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळं उद्धव ठाकरे आत्ता जे ते बोलत आहेत की, त्यावेळी आमच्यासोबत असते तर आज अडीच वर्षे तसेही तुम्हाला मिळाले असते. पण आम्हाला असे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद नकोच. बेईमानीनं अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्याऐवजी ते आम्ही आमच्या ताकदीवर घेऊ, असे काही खुलासेही यावेळी फडणवीसांनी या कार्यक्रमात केले.