संरक्षण व्यवहारात काँग्रेसला दलाली ; पंतप्रधानांचा घणाघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस पक्षाने हिमाचलच्या जनतेला अंधारात ठेवले आणि विकास होऊ दिला नाही. काँग्रेस पक्षाने प्रत्येक संरक्षण व्यवहारात मोठ्या प्रमाणात दलाली घेतली, असा घणाघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
डबल इंजिनच्या सरकारने हिमाचलच्या विकासाला वेग आला आणि आणखी एकदा संधी द्या, असे आवाहनही मोदी यांनी सुंदरनगर येथील सभेत केले.
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या रणधुमाळीला सुरवात झाली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन सभा झाल्या. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतसर येथे बियास येथील राधास्वामी सत्संगचे प्रमुख बाबा गुरिंदर सिंग ढिल्लो यांची भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की गेल्या दोन अडीच वर्षात कोरोनासारख्या गंभीर महासाथीचा हिमाचलच्या लोकांनी मुकाबला केला. राज्यात शंभर टक्के लसीकरण झाले असून अशा प्रकारचे ध्येय साध्य करणारे हिमाचल हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, की आपला देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा असे काँग्रेसला कधीही वाटले नाही. ते लष्कराच्या प्रत्येक साहित्य खरेदीसाठी कमीशन घेऊ इच्छित होते. आपल्या नेत्यांची त्यांना तिजोरी भरायची होती. स्वातंत्र्यानंतर देशातील पहिला गैरव्यवहार हा सत्ताधारी काँग्रेसने संरक्षण क्षेत्रातच केला आहे.
जोपर्यंत देशात काँग्रेसचे सरकार होते, तोपर्यंत संरक्षण व्यवहारात मोठ्या प्रमाणात दलाली घेतली. हजारो कोटींचे गैरव्यवहार केले, अशा शब्दांत पंतप्रधांनांनी घणाघात केले. काँग्रेसने ‘गरीब हटाव’चा नारा दिला होता आणि या घोषणेला आता ५० वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. निवडणूका झाल्या, काँग्रेसने सरकार स्थापन केले, परंतु देशातील गरीबी हटली नाही. खोटी आश्वासने देणे, खोटी हमी देणे हा काँग्रेसचा जुना डाव आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काँग्रेसने आतापर्यंत किती थापा मारल्या हे संपूर्ण देश जाणून आहे.
‘अमृतकाळ ‘च्या या वर्षात हिमाचलच्या विकासाला वेग यायला हवा, स्थिर सरकार असणे गरजेचे आहे आणि ही गोष्ट हिमाचलची जनता, माता भगिनी या गोष्टी चांगल्या जाणून आहेत. काँग्रेसने हिमाचलचे बरेच नुकसान केले आहे. राज्याचा वेगाने विकास करणे आणि दिल्लीतून संपूर्ण मदत मिळवणे यावर शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे, असे मोदी म्हणाले.
भाजपने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० काढण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प पूर्ण केला. भाजपने राम मंदिराचा संकल्प केला होता. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी होत आहे. त्यामुळे आम्ही जे काही बोलतो तो करून दाखवतो आणि तीच भाजपची ओळख आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान…