भाजपा-शिंदेगट राज्यात एकत्र निवडणूक लढविणार ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील आगामी सर्व निवडणूका या एकनाथ शिंदे यांच्यासोबत युतीकरून एकत्र लढविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी भिवंडीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
तसेच विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत २०२४ मध्ये महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील कोणते नेते भाजपाच्या वाटेवर आहेत या चर्चेला सुरूवात झाली आहे.
संघटनात्मक बांधणीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात दौरे सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून ते ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी ते भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या दौऱ्यात होते. त्यावेळी बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. संघटना अधिक मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणे आणि आगामी निवडणूकांमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील बाळासाहेबांची शिवसेनेसोबत युती करून संपूर्ण राज्यात निवडणूका लढण्याचा विचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली ४५ हून अधिक लोकसभा जागा जिंकण्याचा प्रयत्न असून त्याकरिता संघटनात्मक बांधणी सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणूकांमध्ये २०० हून अधिक जागा जिंकण्याचे नियोजन असून त्यादिशेने प्रवास सुरू केला आहे, असे बावनकुळे म्हणाले. २०२४ पर्यंत जनतेला भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढणाऱ्यांना मतदान करणे हा एकच पर्याय असेल, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत काहीच केले नाही. परंतु आमचे सरकार काम करत असताना आमची प्रतिमा मलीन करण्याचे काम महाविकास आघाडीतील नेते करत आहेत. सरकारबद्दल चुकीची माहिती पेरली जात आहे. भाजपाने आता कंबर कसली असून खोटे बोलणाऱ्यांचा भाजपा रस्त्यावर उतरून विरोध करेल, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या अनेक योजना जाणीवपूर्वक महाविकास आघाडीने थांबविल्या होत्या. त्याचा फटका राज्यातील जनतेला बसला होता. आता पुन्हा एकदा या योजना राबविल्या जात आहेत. केंद्र आणि राज्य एकत्रितपणे काम करत आहेत. तीन दिशेला तोंड असलेले पक्ष सत्तेच्या राजकारणाकरता एकत्र आले होते. आता शिंदे-फडणवीस सरकार बहुमतात असल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत, असा दावाही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांची सत्ता बदल झाल्यानंतर भिवंडीतील विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ही कामे पुन्हा सुरू करण्यासाठी आणि भिवंडीच्या विकासासाठी एक वेगळी बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
धन्यवाद मोदीजी कार्यक्रम
पाच कोटींहून अधिक लाभार्थ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यातील दोन कोटी लाभार्थी स्वत:च्या अक्षराने ‘धन्यवाद मोदीजी’ असे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहे. राज्याला आणखी मोठी योजना मिळविण्यासाठी हा कार्यक्रम आखला असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.