राज्यात होणार आणखी एक युती…? नाना पटोले यांचं सूचक विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वंचित बहुजन विकास आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आतापासूनच वंचित आणि काँग्रेसच्या युतीची चर्चा रंगली आहे.
मात्र, अजून युती संदर्भात वंचितकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. वंचितकडून प्रस्ताव आल्यास त्यावर नक्कीच विचार करू, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुका लवकरच राज्यात पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी कडून काँग्रेसला प्रस्ताव पाठवला आहे, ‘त्यांच्याकडून कुठल्याही चर्चेसाठी निमंत्रण नाही, असं वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
वंचित आघाडीकडून असा कुठलाच प्रस्ताव सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा माझ्याकडे आलेला नाही, असा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
‘प्रकाश आंबेडकर हे भाषणात फक्त सांगत आहेत मात्र आमच्याकडे कुठलाच प्रस्ताव युती संदर्भात आलेला नाही प्रस्ताव पाठवल्याचे प्रकाश आंबेडकर का सांगत आहेत. हे कळत नाही, त्यांचा प्रस्ताव आल्यास तो प्रस्ताव पाहून नक्कीच विचार करू, असंही नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधीच्या यात्रेसाठी काँग्रेस नेत्यांची चालण्याची तयारी सुरू केली आहे. नाना पटोले भल्या पहाटे मॉर्निंग वॉकला निघाले आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आता जय्यत तयारी करताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील या यात्रेचा शेवट बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सहकाऱ्यांसह शेगावात सकाळी उठून मॉर्निंग करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी राहुल गांधींची यात्रा राजकीय नसून ती फक्त भारत जोडो साठी निघालेली असल्याचे भाष्य करत त्यांनी राजकीय विधान करणं टाळलं आहे.