एकेकाळी जिल्ह्यात ११ आमदार अन् आता एकच…! ‘काँग्रेसमुक्त सोलापूर’ कायम ठेवण्यासाठी भाजपचा नवीन डाव…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्ह्यातील १३ मतदारसंघापैकी ११ आमदार काँग्रेसचे होते. पण, आता काँग्रेसचा एकमेव आमदार (प्रणिती शिंदे) आहे.
काँग्रेस फुटल्यावर सुध्दा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचेच जिल्ह्यात वर्चस्व होते. पण, आता त्याच जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होते की काय, अशी अवस्था आहे. जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ व शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यातील ‘शहर मध्य’वर भाजपने सर्वाधिक फोकस केला आहे. उर्वरित मतदारसंघातील ताकदवान किंवा विद्यमान आमदारांना भाजपमध्ये आणण्याचे डावपेच सुरु असल्याचीही चर्चा आहे. तरीपण, प्रणिती शिंदे यांच्या कामामुळे त्या पुन्हा विजयी होतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांना आहे.
सध्या शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, माळशिरस, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा आणि बार्शी या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व आहे. सांगोला मतदारसंघ शिवसेनेचे (सध्या एकनाथ शिंदे गट) शहाजी पाटील यांच्या ताब्यात आहे. सोलापूर (डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी) व माढा (रणजितसिंह नाईक-निंबाळकर) लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाजपचेच आहेत. दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सध्या राजकारणापासून अलिप्त झाले आहेत. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यावरच जिल्ह्यातील काँग्रेसची जबाबदारी आहे. पण, त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्याच पक्षातील काही बडे नेते विरोधकांच्या वळचणीला गेल्याने त्यांना तेथेच अधिक लक्ष द्यावे लागत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी हा मित्रपक्ष काँग्रेसमधील नेत्यांनाच आपल्याकडे घेत आहे. अशा परिस्थितीत भाजपने पण त्यांची कोंडी करायला सुरवात केली आहे. त्यामुळे आमदारकी व खासदारकीच्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा काँग्रेसमुक्त होतो की काय, अशी चिंता पक्षातील अनेकांना सतावू लागली आहे. निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापुरातून काही दिवस ठाण मांडून असतील, हे निश्चित.
भाजपकडून बेरजेचे राजकारण
माढा लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपने मतदारसंघात स्ट्राँग असलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटलांना पक्षात घेतले. भाजपचा डाव त्याठिकाणी यशस्वी झाला. माढा लोकसभा व माळशिरस विधानसभा भाजपने मिळविली. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी या युवा नेत्याला मैदानात उतरवले आणि तो मतदारसंघ मिळवला. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ मिळविण्यासाठी प्रशांत परिचारकांची मदत घेत तेथे समाधान आवताडेंना विजयी केले. करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून तसा प्रयत्न होऊ शकतो. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून ‘शहर मध्य’ काबिज करण्याचे डावपेच आखले जात आहेत. परंतु, भाजपचे डावपेच यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत यश मिळवावे लागणार आहे.