…हा म्हणजे आंधळी कोशिंबीरीचा खेळ, कडू-राणा वादात अंधारेंचा फडणवीसांवर प्रहार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत एक खुलासा केला. बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते.
मी स्वत: त्यांना फोन केला होता. आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे, तुम्ही आमच्यासोबत यावं, असं सांगितलं होतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. बच्चू कडूंसंदर्भातील देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या खुलाशानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे – एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडाशी संबंध नाही असे म्हणायचे व दुसरीकडे मीच बच्चू कडू यांना गोवाहटीला पाठवले म्हणायचे हा म्हणजे आंधळी कोशिंबीरचा खेळ आहे, या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
बंडाळी ही भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे, असा दावाही त्यांनी केला. तसेच भाजपच्या सांगण्यावरून गेलेल्या आमदारांना हिंदुत्वच कळलं नाही. तर त्यांचे हिंदुत्व देवेंद्र फडणवीस यांनी जागं केलं. बंडखोरी ही सत्यासाठी नव्हे तर सत्तेसाठी झाली, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
त्या सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीसांवर टीका केली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिंदे यांच्या बंडांशी काहीही संबंध नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. मात्र, बच्चू कडू यांना मीच फोन करून गुवाहाटीला जायला सांगितलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे विरोधकांकडून याबाबत टीका केली जात आहे.
हा सर्व आंधळी कोशिंबिरीचा खेळ वाटत असून याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य, मुख्यमंत्री पदाच्या स्वागताच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी केलेले वक्तव्य व त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य यावरून भाजपाच्या सांगण्यावरून हे झाले, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच भाजपच्या सांगण्यावरून हे सर्व झालं असेल तर गेलेले सर्व 40 आमदार यांना हिंदुत्वच कळलं नसून यांचं हिंदुत्व हे देवेंद्र फडणवीस यांनी जागं केलं व देवेंद्र फडणवीस यांचे सारथी ठरले, अशी खोचक टीकाही अंधारे यांनी केली.