राष्ट्रवादीमुळेच भाजपची राज्यात सत्ता आली, काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात 2014 साली आघाडी सरकारचे काम चांगले होते. परंतु या सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता आणि आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते.
याचबरोबर भाजप वाढीला संधी मिळाली नसती परंतु राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे भाजप सत्तेत आला, असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते काल (दि.28) कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी त्यांनी 2014 साली घडलेल्या घटनेचा किस्सा सांगितला.
राज्यात २०१४ मध्ये आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडले. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. एकप्रकारे यानंतर आलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आल्याचा आरोप नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचेच सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला. यातूनच एकप्रकारे राज्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर यायला कोण कारणीभूत हे सगळ्यांना समजले, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.
जी23 चा मुख्य हेतू साध्य झाला
काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लोकशाही मार्गाने पार पडल्यामुळे ‘जी २३’चा मुख्य हेतू सफल झाला. पण, निर्णयाला उशीर झाल्याने अनेक जण पक्ष सोडून गेल्याची खंत चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये २२ वर्षांनंतर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. तशी आमची मागणी होती. आम्ही ती लावून धरली नसतीतर कदाचित अजूनही अशा निवडणुका झाल्या नसत्या.
नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगले काम करतील. हिमाचल प्रदेश, गुजरात राज्यांच्या निवडणुकांसह येत्या लोकसभा निवडणुकीला काँग्रेस नियोजनाने समोरे जाईल असा विश्वास चव्हाण यांनी दिला.