मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली ; नार्वेकरांच्या सुरक्षेत मात्र वाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.
यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मविआच्या महत्वाच्या नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारनं काढली आहे. यामध्ये वरुण सरदेसाई, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनिल केदारे, डेलकर कुटुंबिय यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. तर मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, ती वाय प्लस एस्कॉर्ट करण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या दोघांचीच सुरक्षा कायम ठेवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याचबरोबर ठाकरे, पवार कुटुंबियांची सुरक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर उमेदवार होते. त्यावेळी आशिष शेलार, शरद पवार यांनी त्यांना मदत केली होती. पण ठाकरे कुटुंबाची तीन मत त्यांना मिळू शकत नव्हती. त्यामुळं नार्वेकर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच कदाचित त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, अशी चर्चाही सुरु झाली आहे.