“.तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते” रामदास कदमांनी केलं मोठं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं.
त्यामुळे राज्यात आधीचं सरकार (महाविकास आघाडी) विस्कळीत झालं. त्यामुळे सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनतेत्यांमध्ये सतत टीका, टिपण्णी सुरूचं असतात. अशातच माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी एक मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले रामदास कदम
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत अजित पवारांचा बॅनर लावला असून त्यावर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
यावरून रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघावीत, स्वप्न बघायला कुणाची काहीही अडचण नाही. शिवसेनेच्या आमदारांना संपवून स्वत: मुख्यमंत्री बनायचं, अजित पवारांचं स्वप्न होतं. त्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले, असं म्हणत रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना रामदास कदम असंही म्हणाले की, पण शिवसेनेच्या 40 आमदारांना वेळीच हे सगळं कळालं. त्यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंना ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांना भेटायचा प्रयत्न केला. पण उद्धव ठाकरे त्यांना भेटले नाहीत, त्यांचं ऐकूनही घेतलं नाही.
त्यामुळेच आपली आमदारकी वाचवण्यासाठी संबंधित आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून कदाचित आज त्यांची आमदारकी वाचेल.नाहीतर सगळे आमदार संपले असते, शिवसेनाही संपली असती. शिवसेनेला संपवून अजित पवार नक्की मुख्यमंत्री झाले असते. पण 40 आमदारांनी योग्य वेळी योग्य पाऊल उचललं.
दरम्यान, रामदास कदम यांनी अजित पवारांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याला अजित पवार काय प्रतिक्रिया देणार. हे पाहाणं महत्वाचं ठरणारं आहे