शिरसाट, गोगावले, बच्चू कडू यांना मंत्रिपदे निश्चित…? ; भाजप अन् शिंदे गटाकडून प्रत्येकी चौघांना संधी….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे.
या विस्तारात शिंदे गटाच्या चार आमदारांना, तर भारतीय जतना पक्षाच्या चार आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे गटाकडून मागच्या विस्तारात संधी हुकलेले आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, अपक्ष आमदार बच्चू कडू यांची मंत्रिपदे पक्की समजली जात आहे. या शिवाय आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबीटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम यांचीही नावे चर्चेत आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट आणि गोगावले यांची नावे यादीत होती. मात्र, ऐनवेळी त्यांची नावे कापण्यात आली होती. त्यामुळे शिरसाट यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडूही आक्रमक झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे मंगळवारी (ता. २५ ऑक्टोबर) सांगितले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाची नावे पुढे आली असली तरी भाजपच्या नावाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या नावाबाबत उत्सुकता आहे.
पाहिला मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर महिनाभरानंतर झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची आमदारांना प्रतीक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात कॅबिनेटबरोबरच राज्यमंत्रीपदेही भरण्यात येणार आहेत, असे खुद्द फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इच्छुकांना झुलवत ठेवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातही सर्व मंत्रिपदे भरण्यात येणार नाहीत. नाराज आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराचे गाजर दाखवण्यासाठी काही मंत्रिपदे रिकामी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.