‘भारत जोडो’ साठी पवार, ठाकरेंना निमंत्रण; सहभागी व्हायचे की नाही ते…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप विरोधी संघटना, संस्था, पक्षांना सोबत घेऊन तिरंगा झेंड्याखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे.
यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. महाराष्ट्रात यात्रा आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहभागी होण्यासाठी आम्ही निमंत्रण दिले आहे. सहभागी व्हायचे की नाही, हा ज्यांच्या त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपविरोधात देशात लाट निर्माण होत आहे, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने त्याची चाहूल लागते आहे. देशात निर्माण झालेली अस्थिर स्थिती व देशासमोरील आव्हाने लक्षात घेता भाजप त्यात असफल झाली आहे. त्यामुळे यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आगामी निवडणुकीत त्याचा परिणाम दिसणार आहे.
जातीयतेचे विष पेरणाऱ्या भाजपच्या विरोधात ज्या काही संघटना, संस्था, पक्ष आहेत. त्यांना सोबत घेऊन तिरंगा झेंड्याखाली आमची यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्या साऱ्यांनीच सहभागी होण्याचे आमचे आवाहन आहे. महाराष्ट्रात ती यात्रा आल्यानंतर त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहभागी होण्यासाठी आम्ही निमंत्रण दिले आहे. सहभागी व्हायचे की नाही, हा ज्यांच्या त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.
ईडी, सीबीआय सारख्या संस्थाचा दबाव आणून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा एककल्ली कार्यक्रम सुरू आहे. त्याला निश्चित ब्रेक लागणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधानच भाजपला मान्य नाही. त्यामुळे भाजपने देशातील सर्व स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्या आहेत. त्यात सीबीआय, न्यायालय, निवडणूक आयोग यांचा समावेश आहे. त्यांच्या स्वायत्तेवरच गदा आली आहे. त्यामुळे देशातील वातावरण अस्थिर करण्याचे काम सुरू आहे. तो प्रकार रोखण्याचे काम काँग्रेस करत आहे. त्याला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.