गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून ‘सामना’वर बंदीची मागणी ; काय आहे नेमकं प्रकरण….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत त्यांना पाठींबा देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
यावेळी गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी राजकीय भूमिका घेत उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी मागणी केली आहे. त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. दैनिक ‘सामना’तून रश्मी शुक्ला यांचं अप्रत्यक्षपणे खच्चीकरण होत असल्याचा आरोप, सदावर्ते यांनी केला आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून अनेक राजकीय गोष्टींवर भाष्य केलं जातं.
या मुखपत्रावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट दिली आहे. या बाबीचा संबंध सामना मुखपत्राशी जोडत सदावर्ते यांनी ही मागणी केली आहे. रश्मी शुक्ला यांचं ‘सामना’तून खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
दैनिक सामना बंद झाला पाहिजे, यासाठी आरएनआय ( रजिस्टार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडिया ) कार्यालयाकडे मागणी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगकडे तक्रार केली आहे. तर, ‘सामना’ प्रकाशित होऊ नये, म्हणून राज्य गृहमंत्रालयाने याची दखल घ्यावी,” अशी मागणी सदावर्ते यांनी केल्याने उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. सदावर्ते यांच्या या मागणीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“‘सामना’वर कोणी बंदी आणू नाही शकत. त्यांना शिवसैनिक आणि न्यायालयीन लढाईशी ‘सामना’ करावा लागेल”, असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्याला प्रसिद्धी हवी आहे, त्याने फक्त उद्धव ठाकरे आणि ‘सामना’वर बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे,” असे प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर यांनी सदावर्तेंना दिलं आहे. दरम्यान , या संदर्भात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.