महाविकास आघाडीत का गेलो…?, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात खुलासा…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विजयादशमीच्या मुहूर्तावर मुंबईत होत असलेल्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. या दोन्ही दसरा मेळाव्यांचे प्रमुख आकर्षण असलेले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज काय बोलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
अशातच आता उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची पिसं काढली.
काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय. मी मुख्यमंत्री का झालो होतो? भाजपानं पाठीत वार केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा सात जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहीत नव्हतं की बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी आहे? की बोलताना स्वत:ची दाढी स्वत:च्याच तोंडात जात होती? घेतली होती ना इथेच शपथ? अमित शाह जे बोलले की आमचं असं काही ठरलंच नव्हतं. मी आज शिवरायांच्या साक्षीनं माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो की जे मी बोलले, ते तसंच ठरलं होतं. भाजपा आणि शिवसेनेचं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
आनंद दिघेंना जाऊन २० वर्ष होऊन गेली. आजपर्यंत आनंद दिघे आठवले नाहीत. पण आज आठवतायत, कारण आनंद दिघे आता काही बोलू शकणार नाहीत. आनंद दिघे जातानाही भगव्यात गेले. ते एकनिष्ठ होते. त्यांनी भगवा सोडला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना टोले लगावले.