थरूर यांच्या जाहिरनाम्यात घोडचूक ; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या जाहीरनाम्यात मोठी चूक दिसून आली होती. थरूर यांच्या जाहिरनाम्यात भारताचा विकृत नकाशा दाखवला गेला होता.
यामध्ये पाकव्यप्त काश्मीर आणि लडाखचा काही भाग दाखवण्यात आला नव्हता.
थरूर यांच्या कार्यालयातून हा जाहीरनामा जारी करण्यात आला होता. मात्र, जाहीरनामा समोर आल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर थरूर यांच्या कार्यालयाने तत्काळ नकाशा दुरुस्त करून पीओकेसह संपूर्ण काश्मीर दाखवले.
दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. त्यामुळे थरूर यांचा मार्ग काहीसा मोकळा झाला आहे. थरूर यांनी आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे आपला अर्ज सुपूर्द केला. शशी थरूर त्यांच्या समर्थकांसह ढोल-ताशांच्या गजरात एआयसीसी मुख्यालयात पोहोचले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी थरूर सकाळी राजघाटावर पोहोचले होते. त्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. एका ट्विटमध्ये थरूर म्हणाले की, महात्मा गांधींनी भारताची निर्मिती केली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, भारत हा जुना देश आहे. पण तरुण राष्ट्र आहे. “भारताला मजबूत, स्वतंत्र, स्वावलंबी बनवण्याचे आणि जगातील राष्ट्रांची सेवा करण्यात आघाडीवर राहण्याचे माझे स्वप्न आहे.