वर्षभरातच विदर्भ राज्य वेगळे होणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मूर्तिजापूर :- सन २०२३ संपायच्या आत वेगळे विदर्भ राज्य विदर्भातील युवा पिढीच्या हाती देणार, अशी सिंहगर्जना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी येथे केली.
येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेगळ्याविदर्भ राज्याची मागणी ११७ वर्षांपासून सर्वात जुनी आहे, परंतु राज्यकर्त्यांच्या वेळकाढू धोरणामुळे ती पूर्ण होऊ शकली नसल्याबाबत खंत व्यक्त करून आता तीन टप्प्यात निकराचा लढा देऊन विदर्भ राज्य मिळविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात बुधवारी (ता.२८) विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमधील तालुका मुख्यालयी वैदर्भियांची फसवणूक करणाऱ्या नागपूर कराराची होळी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात ता.२ आॕक्टोबर ला गांधी जयंतीच्या पर्वावर कार्यकर्ते सर्वत्र महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांसमोर आत्मक्लेष आंदोलन करतील.
ता. ३ आॕक्टोबरला पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना कलेक्टर, एसडीओ, तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवून वेगळ्या विदर्भ राज्याची तत्काळ निर्मिती करण्याची मागणी करण्यात येईल तसेच ११ जिल्ह्यांमधील १० खासदारांना त्यांची विदर्भाबाबतची भूमिका जाहीरपणे स्पष्ट करण्याबाबत सांगितल्या जाईल.
एनडीएचे घटक नसलेल्या पक्षांच्या खासदारांना, ‘तुझ्याभुजेत नाही बळ, आता विदर्भ सोडून पळ, असे बजावण्यात येईल, अशी आंदोलनाची रणनिती असणारी कृतीपत्रिका वामनराव चटप यांनी यावेळी मांडली.
या पत्रकार परिषदेला रंजना मामर्डे, सुरेश जोगळे, अनिल डाहेलकर, आरविंद तायडे सतिश देशमुख, विजय मोरे, सविता वाघ, योगेश हरणे, गोपाल साबळे, शरद सरोदे, रविंद्र ठाकरे, गुलाबराव म्हसाये आदी उपस्थित होते.