कुटुंबीयांच्या मागणी नंतर पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अखेर ATS कडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सीपीआय नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने राज्य एसआयटीकडून महाराष्ट्र एटीएसकडे हस्तांतरित केला आहे. खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न झाले नसल्याचा आरोप करत पानसरे यांच्या नातेवाईकांनी ही मागणी केली होती.
महाराष्ट्र एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. मात्र पानसरे कुटुंबीय त्याबाबत समाधानी नाहीत. तसंच तपास एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. या मागणीवर राज्य सरकारला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सरकारला सुनावले होते. त्याचबरोबर पानसरे कुटुंबीयांच्या मागणीवरील निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.
पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कन्नड अभ्यासक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात एटीएसनेच धागेदोरे शोधले होते. एटीएसने २०२० मध्ये औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात काहीजणांना अटक केली होती. त्यातून या चारही हत्यांचे सूत्रधार सारखेच असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनीच पानसरे यांच्यावर गोळीबार केल्याचे त्यातील आरोपींच्या चौकशीत उघड झाले होते, असे पानसरे कुटुंबीयांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.