“तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका प्लीज , त्यांचे आभार माना” ; देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांची उडविली खिल्ली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 23 जुलै :- भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली. भाजपचा आज पनवेलमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांच्याबद्दल बोलायला लागले तेव्हा कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणाबाजीच आवाज ऐकू येतो. त्यावेळी फडणवीस कार्यकर्त्यांना संजय राऊत यांचं आभार मानण्याचा सल्ला देतात. संजय राऊत यांच्यामुळेच सरकार स्थापन झालं आहे.
त्यामुळे त्यांचं आभार माना, असं फडणवीस उपरोधिकपणे बोलतात. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? “तसे नऊ वाजता बोलणारे अलिकडच्या काळात कमी बोलायला लागले. कारण काय मला माहिती नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज.
त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेव्हा इतर कुणाचाच नाही. महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी वैताग आणला. शिवसेनेच्या जनतेला त्यांनी वैताग आणला.
सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. म्हणजे सगळ्यांनी मिळवून ठरवलं की, हे लाऊडस्पीकर बंद करायचं असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. तर खरोखर आपण त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत”, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांकडून काही प्रश्न विचारण्यात आले.
त्यावरही फडणवीसांनी मिश्किल उत्तर दिलं. “अरे बाबांनो काही गोष्टी खासगीत सांगणार आहे. सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर बोलता येत नाहीयत. त्या मी तुम्हाला खासगीत सांगेन”, असं फडणवीस म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले फडणवीस? “मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. कुठल्याही सरकारचे एकच मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्री हेच नेते असतात. त्यामुळे आपले नेते एकनाथ शिंदे हेच आहेत.
ते मी याकरता सांगतोय की, मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी एवढंच सांगितलं, आपल्याला हे माहिती नव्हतं. आपल्याला वाटलं आपलंच सरकार येणार आहे.
आपल्याला आपलाच मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे. अचानक हा निर्णय आल्यामुळे धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कुणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा आपलं वेगळं मत आहे, असं बिल्कूल नाही.
तर त्या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळे एकत्रित होतो. आता हे चालत असतं. माध्यमांचं काम असतं. ते त्यांचं काम करत असतात. आता शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. हे सरकार अडीच वर्षाचा कार्यकाळा पूर्ण करेलच त्यासोबत भव्य जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.