ठाकरेंची की शिंदेंची शिवसेना कोणाची…? ; वाद आता निवडणूक आयोगाकडे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं.
त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्तास्थापन केली. सत्तास्थापनेनंतर अनेकांनी शिवसेनेची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात जाण्यात धन्यता मानली.
शिंदेंनी जवळपास शिवसेना हायजॅक केल्याची चर्चा सुरु झाली. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरही आपला दावा सांगितला. त्यामुळे शिवसेना कुणाची या वादाला तोंड फुटलं. अखेर हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे.
निवडणूक आयोगाने या वादावरुन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, या दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करायला सांगितले आहेत.
निवडणूक आयोगाने हे कागदपत्र सादर करण्यासाठी दोन्ही गटांना 8 ऑग्स्टपर्यंतची मुदत दिली आहे. या दोन्ही गटांना 8 ऑग्स्टला दुपारी 1 पर्यंत हे पुरावे सादर करायचे आहे. त्यामुळे आता या दोन्ही गटाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे राज्याच्या राजकारणाचं लक्ष लागून असणार आहे.