मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य विधिमंडळाचे 18 जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने शुक्रवारी जाहीर केला. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विधिमंडळात मतदान पार पडणार आहे.
त्याचप्रमाणे आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप झालेला नाही. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच निर्माण झाल्याने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनाची पुढील तारीख संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र 18 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असल्याने 18 जुलैऐवजी 19 किंवा 20 जुलैपासून हे अधिवेशन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पत्रकार परिषदेत दिले होते. मात्र रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पाहता हे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयातर्फे सर्व आमदारांना कळविण्यात आले आहे. अनिश्चित काळासाठी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याने पावसाळी अधिवेशन केव्हा सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.