पुराचे पाणी घुसले बँकेत ; 12 लाखांची रोकड भिजली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- हिंगोली जिल्ह्यातील एसबीआय बँक आणि सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत आसना नदीचे पाणी गेल्याने बॅंकेतील 12 लाख 22 हजार रूपयांची रोकड भिजली आहे.
शिवाय बँकेतील फाईल देखील भिजल्या असून संगणकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून हिंगोली मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे कुरुंदा गावातील अनेक घरांमध्ये आसना नदीचे पाणी शिरले होते. हे पाणी एसबीआय, जगद्गुरु पतसंस्था आणि शिवेश्वर सहकारी बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचले. त्यामुळे शिवेश्वर बँकेचे 22 हजार रुपये आणि जगद्गुरू पतसंस्थेचे 12 लाख रुपये भिजल्याची माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
9 जुलैपासून हिंगोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन देखील झालेलं नाही. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळमनुरी आणि वसमत तालुक्याला अतिवृष्टीचा दुसऱ्यांदा फटका बसला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा गावात जवळपास चार ते पाच फूट पाणी शिरलं होतं. गावात नदीकाठची काही घरं पाण्याखाली गेली होती. उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे. तसेच घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागच्या पाच-सहा दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. अनेक मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पावसाने आज थोडीफास उसंत दिली आहे.