अनिल परब यांच्या अडचणीत वाढ ; केंद्राची टीम रिसॉर्टवर दाखल ; चौकशी सुरू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रत्नागिरी, 14 जुलै :- राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने अनिल परब यांच्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी चौकशीसाठी नेमलेली समिती साई रिसॉर्टवर दाखल झाली आहे.
पर्यावरण खात्याची पाच जणांची टीम मुरुडमधील रिसॉर्टवर दाखल झाली आहे. या टीममध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकारी आहेत. साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेल्या टीमकडून आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली याची चौकशी सुरु आहे. तसेच पर्यावरणाच्या हानीचीदेखील या टीमकडून चौकशी सुरु आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या मुरुड मधल्या साई रिसॉर्टने सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे रत्नागिरीत साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेली टीम ही रिसॉर्टप्रमाणेच कोच रिसॉर्टचीदेखील चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, साई रिसॉर्ट प्रकरणी महत्त्वाचे कागदपत्रे मिळावे यासाठी केंद्राच्या पर्यावरण विभागाची टीम दापोली प्रांत कार्यालयात दाखल झाली.
अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची पाहणी करून केंद्र आणि राज्याची टीम दापोली प्रांत कार्यालयात दाखल झाली. या टीमने दापोली प्रांत अधिकारी यांच्याकडे महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची पुन्हा यंत्रणेकडून चौकशी सुरू झाली आहे. दापोली प्रांत कार्यालयात महत्त्वाच्या माहितीसाठी बराच वेळ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.
साई रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांचा आरोप काय?
साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले.
भारत सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कराणे दाखवा नोटीस बजावली. या रिसॉर्टची बिनशेती (NA) आदेश फोर्जरी / फसवणूक करुन मिळवण्यात आला होता म्हणून रद्द करण्यात आला. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परबने सदानंद कदमला 1.10 कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणीसाठी अर्ज केला. डिसेंबर 2020 मध्ये 2020-21 या वर्षांचे घरपट्टी / कर अनिल परबांनी ग्रामपंचायतीला भरणा केला.