उद्धव ठाकरेंची उरलेल्या 15 आमदारांना लिहिलं भावनिक पत्र ; पत्रात म्हणाले की “आईच्या दुधाशी बेइमानी….”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिवसेनेच्या 15 आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे.
आज सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरच्या याचिकांवर निकाल जाहीर होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना मोठ्या प्रमाणात फुटली. शिवसेनेचे 40 आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना वेळोवेळी आवाहन देखील केलं होतं. मात्र 40 पैकी एकही आमदार परतलेला नाही. आता उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वी त्यांच्यासोबत राहिलेल्या 15 निष्ठावान शिवसेना आमदारांनी भावनिक पत्र लिहीले आहे. या पत्रात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडचणीच्या आणि संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले आहेत.
पत्रात म्हटलं आहे की, आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत राहत निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना असं पत्रात म्हटलं आहे.
पत्रामध्ये म्हटलं आहे, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण निष्ठेचं पालन केलंत. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असल्याचं आपण दाखवून दिलंय, असं पत्रात म्हटलं आहे.
आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात. आपल्या भूमिकेमुळं महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळालं आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.