सलमान खानच्या वकिलांना धमकीचं पत्र…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अभिनेता सलमान खानच्या वकिलाला धमकीचं पत्र देण्यात आलंय. सिद्धू मुसेवालासारखा तुझा हाल करु, अशी धमकी सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांना देण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून हे पत्र आल्यानं एकच खळबळ उडालीये. काही आठवड्यांपूर्वी सलमानलाही असंच धमकीचं पत्र आलं होतं. त्यानंतर आता सलमान खानच्या वकिलांनाही धमकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पत्राद्वारे देण्यात आलेल्या धमकीनंतर आता पोलीसही पुन्हा सतर्क झालेत. हे पत्र जोधपूर हायकोर्टाच्या जुबली चेंबरच्या कुंडीत आढळून आलंय. या पत्रात लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकावण्यात आल्याचे संकेतही आढळून आले आहेत. या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
आधी सलमानला आता त्याच्या वकिलांना धमकी
तुझा सिद्धू मुसेवाला करु, अशी धमकी सलमान खान यालाही पत्राद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई याची या धमकीप्रकरणी चौकशीही करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडून या धमकीप्रकरणी सर्व खबरदारी बाळगण्यात आली होती. सलमान खानच्या एका सुरक्षारक्षकाला धमकीचे हे पत्र आढळलं होतं. दरम्यान, आता सलमान खाननंतर राजस्थानातील जोधपुरात असलेल्या त्याच्या वकिलांनाही धमकीचं पत्र समोर आलंय. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगचं राजस्थान कनेक्शन पुन्हा उघड झालंय. सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांना धमकी देण्याआधी बिश्नोई गँगच्या तिघांनी मुंबईत धमकीचं पत्र पोहोचवलं होतं. विक्की बराडच्या माध्यमातून या पत्राद्वारे अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकावण्यात आलेलं होतं.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने दहशत माजवली आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तिथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला इथल्या अबोहर भागात राहणारा आहे. 2018 मध्ये त्याने जेव्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली, तेव्हा तो देशभरात चर्चेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या गँगशी संबंधित काही शूटरला अटक केली होती. लॉरेन्स कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या निवडणुकीत सहभागी झाला होता. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्याने विरोधकांवर गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून त्याच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली. त्याच्याविरोधात 50 पेक्षा जास्त लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.