बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लवकरच पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : “जेणो काम तेणो थाय, दुजा करे सो गोता खाय”, अशी गुजराती म्हण आहे. ज्याचे काम त्याने करावे दुसऱ्याने करायला गेले तर नुकसान होते, असा त्याचा अर्थ आहे.
पण आता वेगळ्या संदर्भात ही गुजराती म्हण प्रत्ययाला येते आहे. ज्या समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते, त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटनही आता खुद्द त्यांच्याच हस्ते लवकरच होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात हे जाहीर केले आहे.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प. या समृद्धी महामार्गाचे काम आता लवकरच पूर्ण होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
फडणवीस यांची घोषणा…..
एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कडून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता वेगाने पूर्ण करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या महामार्गाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या महामार्गाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ठाकरे पवार सरकारने केले आहे. या नामकरणाला शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारची मान्यता आहेच.
उद्घाटन लांबणीवर
या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 2 मे रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. पण उद्घाटनाआधीच या महामार्गाची कमान कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याने त्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. मुंबई ते शेलू बाजार असा हा 210 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा टप्पा असणार आहे.
एकूण 8 टोलनाके
या पहिल्या टप्प्यात एकूण 8 टोलनाके बसवण्यात आले आहेत. या टोलनाक्यांवर कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या हलक्या मोटार वाहनांना प्रतिकिमी 1.73 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहनचालकांना 365 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे.