शिंदे सरकार पाच-सहा महिने टिकेल ; मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा :- शरद पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी करत भाजपसोबत राज्यात सत्तेवर स्वार झाले आहेत.
शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात भाजपप्रणित शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झालं आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन तीन दिवस झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. ‘राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा’, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
आज, रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित होत्या. त्यावेळी शरद पवारांनी आमदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले,राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यवर्ती निवडणुका लागतील. त्यामुळे त्याची तयारी आतापासून करा’.
‘शिंदे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का याबाबत प्रश्न आहे. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात जाऊन काम करत राहा. मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर त्याची तयारी असावी. त्यामुळे आमदारांनी मतदारसंघात लक्ष द्यावे, असेही शरद पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये जसं मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं असतं तसंच विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद हे महत्वाचं असतं. आता याच विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.