39 आमदारांनी व्हीप मोडला ; शिवसेनेकडून तक्रार दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 03 जुलै :- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.
तर शिंदे गटाकडून ही 16 आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. सेनेची तक्रार ही सभागृहाच्या पटलावर घेतली आहे.
लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक झाली. पण, विधानसभेच्या नियमानुसार, पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्या व्हीपच्या विरोधात 39 आमदारांनी मतदान केलं आहे. आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आधीच याचिका दाखल केली आहे.
आधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली. या 39 आमदारांनी व्हीप मोडून मतदान केलं आहे. त्यामुळे आमचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.
तांत्रिक दृष्ट्या जे योग्य आहे, त्यानुसार कारवाई केली पाहिजे असं सुनील प्रभू म्हणाले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलेले आहे. शिवसेनेतील 16 आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केलं आहे, अशी तक्रार शिंदे गटाकडून प्रतोद म्हणून भरत गोगावले यांनी दिले आहे.
दरम्यान, आमदारांनी व्हीप मोडला आहे. आम्ही सभागृहामध्ये पत्र पटलावर आणले आहे. त्यावर योग्य ती कारवाई होईलच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या नैतिकतेची चाचणी घ्यायची होती.
एकाही बंडखोर आमदाराने डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत केली नाही. आज आमच्याकडे पाहून डोळे चोरले आहे. उद्या मतदारसंघामध्ये जाल तेव्हा शिवसैनिकांना काय तोंड दाखवाल, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ‘आम्ही शिवसेना म्हणून इथं आलो आहे. शिवसेना म्हणूनच काम करणार आहोत. आम्हाला काही राक्षसी महत्वाकांक्षा नाही. त्यांनी वेगवेगळी उपमा दिली, हॉटेल, चॉर्टर प्लेन, त्याचा खर्च कुठून झाला हे आम्हाला माहिती नाही’ असंही आदित्य ठाकरे म्हणाले.