संजय राऊत पवारांच्या गळ्यातलं ताईत , ते शिवसेना संपवायला निघालेत ; दीपक केसरकरांचा हल्लाबोल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे दोन गट पडले असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली. महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबतचा तिढा कायम आहे. 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. या दोन याचिकांवर न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे. याच पाश्वभूमीवर शिंदे गटात सहभागी झालेले शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी चार पानांचं पत्र लिहून उद्धव ठकारे गटावर हल्लाबोल केलाय. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गळ्यातलं ताईत असून ते शिवसेना संपवायला निघालेत, असं केसरकर यांनी पत्रात नमूद केलंय.
दीपक केसरसर यांचं ट्वीट-
संजय राऊतांना ईडीचं नोटीस
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या गटासह केलेल्या बंडामुळं शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली. राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच आता राज्यात खळबळ माजवणारी बातमी हाती आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शिंदे गटातील नेत्यांना मोठा धक्का
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या बंडखोन नेत्यांना मोठा धक्का दिलाय. एकनाथ शिंदे यांच्यासह पाच मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांच्या खात्यांचं फेरवाटप करण्यात आलंय. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.