“मविआ सरकार बरखास्त होणार” ; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानपरिषदेच्या निवडणुकीची धूळ खाली बसण्याआधीच महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालाय. एकनाथ शिंदेंनी जवळपास ३५ आमदारांसोबत बंड करत सेनेला आव्हान दिलं. पर्यायाने हे महाविकास आघाडीलाच आव्हान आहे.
बच्चू कडू, शंभूराज पाटील यांच्यासारखे मंत्रीही या बंडात सहभागी झाले आहेत. सूरतमधून या सर्वांना पोलीस संरक्षणात आसामच्या गुवाहटीत नेण्यात आलंय. यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीचं टेन्शन आणखी वाढलंय.
आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सेनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदेंना फोन कॉल केल्याचं सांगितलं. दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती राऊतांनी दिली.
सध्या राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेने असल्याचं ट्वीट राऊत यांनी केलं आहे. यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं स्पष्ट झालंय.
एकतास फोन झाला…जास्तीत जास्त काय होईल? सरकार जाईल
बघू कोणाकडे किती आमदार आहेत, तुम्ही उगाच उतावळे होऊ नका, असा इशारा राऊत यांनी दिला. सध्या आमच्याकडे संख्याबळ आहे. हा आमच्या घरातला विषय आहे. एकनाथ शिंदे आणि अन्य सहकाऱ्यांसोबत माझं बोलणं चालू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही. एकनाथ शिंदेंबरोबर माझं सकाळीच बोलणं झालंय. आमचा एक तास फोन कॉल झाला. काही समज गैरसमज असतात. पण जास्तीत जास्त काय होईल, तर सरकार जाईल,असं राऊत म्हणाले.
भाजपला सत्ता स्थापन करावंसं वाटत असेल, तर त्यांनी उतावळं होऊ नये. यामुळे ठाकरे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असं वाटलं तर राखेतून फिनिक्सप्रमाणे भरारी मारण्याचा आमचा इतिहास आहे, असं राऊतांनी खडसावलं आहे.
आज सकाळी एक तास बोलणं झालं आहे. ते मी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. आमचे आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. पक्षात कोणावरही त्यांची नाराजी नाही. त्यांच्या काही मागण्या नाहीत. ते शिवसैनिक आहेत. परत येतील, असा विश्वास राऊत यांना आहे.