तरूणांचे सैन्यभरतीचे स्वप्न हे चौकीदार होण्या साठी नाही :- राहुल गांधी…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशात केंद्र सरकारच्या अग्निपथ भरती योजनेला तरूणांकडून जोरदार विरोध केला जात आहे. अनेक राज्यांमध्ये जाळपोळ आणि हिसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत, यादरम्यान भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी अग्निवीरांना भाजप कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून निवडीसाठी प्राधान्य देऊ असे विधान केले.
दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, ज्यांनी स्वातंत्र्याच्या ५२ वर्षांपर्यंत ज्यांनी तिरंगा फडकवला नाही, त्यांच्याकडून जवानांसाठी सम्मानाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. तरुणांमध्ये सैन्यात भरती होण्याचा ध्यास आहे तो, चौकीदार बनून भाजप कार्यालयांची राखण करण्यासाठी नाही, तर देशाच्या रक्षणासाठी आहे.
पंतप्रधानांचे मौन हा या अपमानावरचा शिक्कामोर्तब करणारी आहे, असे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत.
विजयवर्गीय काय म्हणाले होते?
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, अमेरिका, चीन आणि फ्रान्समध्ये कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाते. आपल्याकडे सैन्यातून निवृत्तीचे वय जास्त आहे. ती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते म्हणाले की, जेव्हा अग्निवीर ही पदवी घेऊन ते सैन्यातून निवृत्त होतील आणि मलाही या भाजप कार्यालयात सुरक्षारक्षक (गार्ड) ठेवायचा असेल, तर मी अग्निवीरलाच प्राधान्य देईन.
दरम्यान केंद्र सरकारने शनिवारी ‘अग्निपथ’ योजनेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमिवर निमलष्करी दल आणि संरक्षण मंत्रालयांच्या नियुक्त्यांमध्ये “अग्नीवीर” यांच्यासाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले आणि इतर अनेक सवलतींची देखील घोषणा केली आहे.