पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू ; बहिणीप्रमाणे करायची होती देशसेवा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme ) देशातील अनेक भागात विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी या योजनेला विरोध म्हणून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला (Protest) हिंसक वळन लागले आहे.
बिहारमध्ये आंदोलकांनी हिंसक होत अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काल सिकंदराबाद येथे आंदोलनामध्ये बहिणीप्रमाणे देशसेवेत भरती होऊन सेवा करणाऱ्या तरूणाचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
दामोदर राकेश (वय 21) असे आंदोलनादरम्यान गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. आम्हाला आमच्या मुलाला आर्मी ऑफिसर (Army Officer) म्हणून पाहायचे होते, पण आमच्याच पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेल्याचे दामोदरच्या वडिलांनी सांगितले. वारंगलच्या डबीरपेठ गावात राहणारा राकेश अनेक दिवसांपासून सैन्यात भरतीसाठी तयारी करत होता.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या सैन्य भरतीसाठी त्याने फिटनेस टेस्टही (Fitness Test) पास केली होती. 2020 मध्ये यासंबंधी लेखी परीक्षा होणार होती, पण कोरोनामुळे (Corona) ती पुढे ढकलण्यात आली. लवकरच लेखी परीक्षा होईल आणि सैन्यात भरती होईल, अशी आशा राकेशला होती. पण लेखी परीक्षा रद्द झाल्याचे कळताच त्याला खूप धक्का बसला आणि कामाच्या बहाण्याने गुरुवारी तो घराबाहेर पडला.
बहिणीप्रमाणे करायची होती देशसेवा
राकेशची मोठी बहीण सीमा सुरक्षा दलात कार्यरत असून, तिच्याप्रमाणे राकेशलाही सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी राकेशने सैन्य भरतीची तयारी सुरू केली. मात्र, राकेशचे स्वप्न पूर्ण होऊन शकले नाही.
…तर अभिमान वाटला असता
केंद्राच्या अग्निपथ योजनेला देशभरातून मोठा विरोध केला जात आहे. सिंकदराबाद येथेदेखील या योजनेला मोठा विरोध झाला. त्यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी 15 राऊंड फायर केले. यामध्ये 12 जण जखमी झाले. तर, राकेशला छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आमचा मुलगा शत्रूच्या गोळ्यांचा बळी असता तर, आम्हाला अभिमान वाटला असता, पण आमच्याच पोलिसांच्या गोळीबारात तो मारला गेला याचं दुःख आहे.
कुटुंबाला 25 लाखांची भरपाई
दरम्यान, तेलंगणात अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शनादरम्यान विद्यार्थी राकेशच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री केसीआर यांनी राकेशच्या कुटुंबाला 25 लाख रुपये आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरीची घोषणा केली आहे.