फडणवीसांच्या अपयशाची खुद्द गडकरींनीच दिली कबूली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूरमध्ये पेंच आणि कन्हान नद्यांमधून पुरेसा पाणीपुरवठा होत असतानाही गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण शहरात पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे. वितरणाचे काम असमाधानकारक असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे.
जलवाहिन्यांची कामे अपूर्ण आहेत. एकाही भागात २४ तास पाणीपुरवठा होत नाही.” असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपूरमध्ये आयोजित पाणी प्रश्नावरील आढावा बैठकीत ते बोलत होते.
या माध्यमातून मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील पाणीटंचाईची सद्यस्थिती मांडली. असे असताना आता औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात पाणी प्रश्नांवर जल आक्रोश मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरच्या पाणीटंचाबाबत मोर्चा काढणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण नागपूर महापालिकेत भाजपचीच सत्ता असल्याने नागपूरातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधणे अधिक महत्त्वाचे आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाख इतकी असून शहर जुने व नवीन अशा दोन भागात विभागले आहे. नागपूर महापालिकेत भाजपचीच सत्ता असताना शहरात कमी दाबाने पुरवठा, अल्प पाणीपुरवठा आणि पाणीपुरवठाच बंद, हातपंपाला गढूळ पाणी, विहिरीच्या पाण्याला सांडपाण्याचा वास, विहिरी कोरडय़ा पडलेल्या, अशा समस्यांना तोंड देत यंदाही नागपूरकरांनी उन्हाळा काढला. जून महिना उजाडला असतानाही २३० टँकर्सद्वारे आज शहरात पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे नागपूर महापालिका २४ तास पाणी पुरवठ्याचा दावा करत नागरिकांकडून पाण्याचा करही वसूल करते. पण प्रत्यक्षात मात्र उन्हाळ्यात तासभरही पाणीपुरवठा झाला नाही.
यावर्षी पहिल्यांदाच निवासी संकुलांमध्ये खासगी पाण्याचे टँकर्स बोलवावे लागले. पूर्व, दक्षिण, पश्चिम नागपूर या भागामध्ये पाणीटंचाईची तीव्रताही अधिक होती. धक्कादायक म्हणजे फडणवीसांचे नागपुरातील निवासस्थान आणि त्यांच्या स्वत: च्या मतदारसंघात म्हणजे धरमपेठ भागातही या वर्षी पाण्याची तीव्र टंचाई होती. विशेष म्हणजे, हा भाग चोवीस तास पाणी योजनेत समाविष्ट आहे. तर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर या विधानसभा मतदारसंघातही नागरिकांनी पाण्यासाठी मोठे आंदोलन केले.
शहरात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, पाण्यासाठी मटकी फोड आंदोलन झाले. महापालिका सभेतही शहरातील पाणीप्रश्न उपस्थित करण्यात आला. पण महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. पाच वर्षे अशी पाणीटंचाईत गेली. आता महापालिकांचा कालावधी संपला आहे. महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यावरही नागरिक पाण्यासाठी निवेदन देत आहेत. यातून या पक्षाची ढोंगीपण स्पष्ट दिसत आहे. नागपूर शहराला उन्हाळय़ात दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाण्याची गरज आहे व नद्यांमध्ये तेवढे पाणीही उपलब्ध होते, पण वितरण प्रणालीत दोष असल्याने शहराला पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. पण तरीही वितरण प्रणाली दुरुस्त करण्याच्या दिशेने महापालिकेने कधीही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. पण त्यांनीही कधी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. उलट ऐन उन्हाळ्यात म्हणजे २०१८-१९ मध्ये नागपूरकरांना एकदिवसा आड पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले. आता पावसाळा सुरू झाल्याने टंचाईची स्थिती नाही, पण ती पुन्हा निर्माणच होणार नाही अशीही स्थिती नाही. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस नागपुरातही मोर्चा काढणार का, असा प्रश्न आहे.
महापालिकेकडून पाणी वितरण काम काढून घेत ते खासगी कंपनीकडे सोपवण्याचे काम भाजपने केले. त्यावेळी २४ तास पाणीपुरवठा असे या योजनेला नाव देण्यात आले. लोकांनी पाणी साठवून ठेवण्याची गरज नाही, नळाला २४ तास पाणी उपलब्ध होईल, असा दावाही भाजपने त्यावेळी केला. आता याला दहा वर्षे लोटली. पण फडणवीसांचा धरमपेठ मतदार संघ वगळता कुठेही ही योजना लागू करण्यात आली नाही. सुरुवातीपासून अलीकडच्या काही वर्षांपर्यंत भाजप नेत्यांकडून या योजनेचे जाहीर कौतुक होत असते. २४ तास पाणी पुरवठ्याची योजना राबवणारी नागपूर ही देशातील पहिली महापालिका असल्याचा असा दावा भाजपकडून करण्यात आला. ही योजना राबवणाऱ्या कंपनीशी भाजपातील नेत्यांचे व्यावसायिक संबंध होते. त्यामुळे कंपनीनेही कधी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष दिले नाही. दहा वर्षांत कंपनीने शहरभरात जलवाहिन्या टाकल्या नाहीत.
यावर बोलताना शहरातील भाजप प्रवक्ते गिरीश व्यास म्हणतात की, महापालिकेचा कारभार प्रशासनाकडे गेल्यावर पाणीटंचाई सुरू झाली. कुठल्या भागात पाणीटंचाई आहे, याची माहिती महापालिका प्रशासनाकडे आहे. त्या आधारावर त्यांनी नियोजन करणे आवश्यक होते. ते त्यांनी केले नाही. त्यामुळे शहरात आधी पाणीटंचाई होती. पण आत्ता तशी स्थिती नाही.’
तर, आता देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पाणी टंचाईवर मोर्चा काढावा. पण त्यांचे पितळ उघडे पडेल म्हणूत ते तसे करणार नाहीत. नागपूर महापालिकेत त्यांच्याच पक्षाची सत्ता असातना चोवीस तास पाणी पुरवठय़ाच्या नावावर त्यांनी जनतेची लूट केली. पण आता जनतेला या पक्षावर विश्वास राहिला नाही. जालन्यात झालेल्या मोर्चासाठीही भाजपने पैसे देऊन लोकांना बोलवावे लागले, अशी टीका नागपूर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोढें यांनी केली आहे.