खत कंपन्यांनी मासिक नियोजनानुसार खतांचा पुरवठा करावा :- जिल्हाधिकारी अमोल येडगे……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 9 मे :- सर्व खत पुरवठादार कंपन्यांनी दरमाह ठरवून दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात खतांचा पुवरठा करावा. ज्यांचेकडे एप्रिल व मे महिन्याच्या खताचा अनुशेष बाकी आहे त्यांनी तो 20 मे पर्यंत भरून काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी खत पुरवठादारांना दिले.
खत पुरवठाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आज महसूल भवन येथे घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे तसेच विविध खत पुरवठादार कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की कंपन्यांकडे खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तथापी दिलेल्या वेळेत त्याचा जिल्ह्यात पुरवठा झाला पाहिजे. तसेच खत रॅकवरून त्याची तात्काळ उचल होउन संबंधीत गोडावून व दुकानात खतांचा पुरवठा करण्यात यावा. शेतकऱ्यांना खतासाठी कोणतीही अडचण येणार नाही यादृष्टीने खत कंपन्यांनी व कृषी अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात खत उपलब्ध न केल्यास अथवा जिल्ह्याच्या हिश्श्याचे खत मिळविण्यासाठी प्रयत्न न झाल्यास किंवा त्यात निष्काळजीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी स्पष्ट केले.
बैठकीला खत पुरवठादार व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.