विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राची होरपळ सुरुच ; देशातील उष्णतेची लाट कायम….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उत्तरेकडून येणाऱ्या गरम आणि कोरड्या वाऱ्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राची होरपळ कायम असून रविवारी विदर्भातील ब्रम्हपुरीमध्ये राज्यातील उच्चांकी 44.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, राज्यासह उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, तामिळनाडू, राजस्थान, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्येही तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस इतके तापमान कायम आहे.
देशात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस इतके कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 मेपर्यंत उष्णतेची ही लाट कायम राहणार असून अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये याचा प्रभाव राहणार आहे. रविवारी विदर्भात ब्रम्हपुरीत सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ , अकोलात 44 अंश, औरंगाबादमध्ये 40 अंश तर परभणी, नांदेडमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर आणि साताऱ्यामध्ये तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअसची नोंद झाली. राज्यासह देशभरातही उष्णतेची लाट कायम राहणार असून उत्तर प्रदेश, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, तामिळनाडू, राजस्थान, पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्येही तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
असनी चक्रीवादळामुळे ओदिशा, आंध्र प्रदेशमध्ये पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे असनी चक्रीवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिम दिशेने देशाच्या किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. पुढील 12 तासांत हे वादळ अधिक तीव्र होणार असून त्याचा वेग 115 किलोमीटरपर्यंत राहणार आहे. त्यामुळे ओदिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये 10 आणि 11 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात हलक्या सरी
असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात दक्षिण कोकणात 10 ते 12 मे दरम्यान तर पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे