“सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या” ; राणाच्या भेटीनंतर फडणवीस आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा तुरूंगातून बाहेर आल्या आहेत. सध्या त्यांच्यावर मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात Lilavati Hospital) उपचार सुरू आहेत.
राजद्रोहाचे आरोप झाल्यानंतर नवनीत राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईच्या भायखळा तुरूंगात करण्यात आली. भायखळा तुरूंगात रवानगी झाल्यानंतर त्यांची 5 मे रोजी जामीनावर सुटका करण्यात आली होती. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर शनिवारी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी नवनीत राणा यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
रुग्णालयात नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. नागपुरात बोलताना फडणवीसांनी राणा यांच्या अटकेवरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. “नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. पण ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनीही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या असे माझे मत आहे,” असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करू अशी घोषणा खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी केली होती. त्यानंतर शिवसैनिकांना चकवा देत ते गनिमी काव्याने अमरावतीहून मुंबईत आले होते. दरम्यान, मुंबईत आल्यानंतर राणा दाम्पत्य त्यांच्या खार येथील निवास्थानी थांबले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत राणा यांच्या निवास्थानाबाहेर घोषणाबाजी केली होती. काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेतलं होतं. तसेच पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल केला होता.
दरम्यान, अटकेनंतर खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहलं होतं. या पत्रात त्यांनी आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. तसेच तुरूंगात असताना पोलिसांनी त्यांना अमानुष वागणूक दिल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून माझ्यावर आणि पतीवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटले. पोलीस बंदोबस्तात पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या जातीच्या आधारावर त्यांना चांगली वागणूक दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.