मशिदींवरील भोंग्यांवरुन उच्च न्यायालयाने याचिका केली रद्द…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मशिदींवरील भोंगे उतरविण्यावरुन उत्तरप्रदेश, महाराष्ट्रात राजकारण पेटलं आहे. अशातच उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा याबाबत सुनावलं आहे. भोंगाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका अर्जावरील सुनावणी झाली.
याबाबत उच्चन्यायालयाने संबधीतांचे पुन्हा एकदा कान टोचले.
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील बेकायदा भोंगे उतरविले आहे. तर महाराष्ट्रात या मुद्दांवरुन ठाकरे सरकार व मनसे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. भोंग्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यात आली. उत्तरप्रदेशातील एका मशिदीच्या व्यवस्थापनाने ही याचिका दाखल केली होती. मशिदीवरील भोंग्यांवर लावलेल्या बंदीवर याचिकाकर्त्यांने न्यायालयात प्रश्न विचारला होता.
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने धार्मिक स्थळांवरील बेकायदा भोंगे हटविलं आहे. या आदेशाच्या विरोधात बदायू येथील एका मशिदीकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मशिदींच्या व्यवस्थापकांनी “आमच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणल्याचा हा प्रकार आहे,” असे आपल्या अर्जात म्हटलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे. “अजान हा मुस्लिम धर्मियांचा महत्वपूर्ण विषय आहे, पण भोंग्यावरुन अजान देणे असे इस्लाममध्ये म्हटलेलं नाही. या विषयावर यापूर्वी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे. त्यामुळे भोंग्यावर अजान म्हणण्यास परवानगी देऊ शकत नाही,” असे न्यायालयात आपल्या सुनावणीत म्हटलं आहे.
भोंग्यांचा आवाज किती असावा
मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी प्रत्येक प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा कमी ठेवावा, अशा सूचना धर्मगुरूंना दिल्या आहेत. मंदिर व मशीद प्रशासनाकडून भोंग्यांच्या परवानगीसाठी आयुक्तालयात अर्ज येऊ लागले आहेत. मुंबईत एकूण दोन हजार ४०४ मंदिरांची नोंद असून मंगळवारपर्यंत परवानगीसाठी मंदिरांकडून फक्त २८ अर्ज आले आहेत. त्यातील २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत एक हजार १४४ मशिदी आहेत. त्यातील ९४४ मशिदींनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. ९२२ मशिदींना आतापर्यंत परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फक्त अंदाजे एक टक्का मंदिरांनी परवानगी घेतली.
अजान म्हणजे काय….?
अजान म्हणजे नमाज पठण करण्यासाठी नमाजच्या वेळेची आठवण करून देणे. दिवसातून पाच वेळा अजान म्हटली जाते. म्हणजे दिवसापासून पाच वेळा नमाजच्या वेळेची आठवण करून दिली जाते. नमाजची वेळ ठरलेली नसते. सूर्याच्या दिशेनुसार आणि स्थानानुसार दररोज वेळ बदलते. त्यामुळे ती त्याचदिवशी सांगितली जाऊ शकते आणि म्हणून एकाचवेळी सर्वांना ही वेळ समजावी किंवा नमाज पठणासाठी बोलवावं यासाठी लाऊडस्पीकरचा वापर सुरू झाला.