वीस वर्षापासून रखडलेले नाट्यगृहाचे काम लवकरच पुर्ण करणार रंगमंच 26 जानेवारीपासून उपलब्ध करण्याचे नियोजन :- पालकमंत्री संदिपान भुमरे ; माहे मे अखेरपर्यंत अमृत पाणी पुरवठा सुरू होणार ; मेडीकल कॉलेज समोरील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन ; वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन केंद्र येथे 14 दुकानांचा शुभारंभ ; जिल्ह्यात कर्तबगार अधिकारी मिळाल्याने अर्धवट योजना मार्गी.…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 2 मे, :- मागील तब्बल 20 वर्षापासून यवतमाळ शहरातील नाट्यगृहाचे रखडलेले काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि येत्या 26 जानेवारीपासून यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांना आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्यसाठी हक्काचा रंगमंच उपलब्ध होईल, अशी ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली आहे.
यवतमाळ नगरपालिकेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नाट्यगृह बांधकामाचे पुननिर्माण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नरगपरिषदेच्या प्रशासक माधुरी मडावी, माजी नगराध्यक्षा कांचन चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.
नाट्यगृह संकुलाचे उर्वरित शिल्लक स्थापत्य विषयक काम तसेच पाणी पुरवठ्याची कामे, बैठक व्यवस्था, एच.व्ही.एस.सी. आणि फायर फायटींगची कामे, ऑडिओ आणि व्हीडीओची कामे, आतिल व बाहेरील इलेक्ट्रीकलची प्रलंबित कामे व सौंदर्यीकरण यासाठी तीन कोटी 67 लक्ष 43 हजार रुपयांच्या प्रशासकीय निधीची आवश्यकता होती. यात 25 टक्के नगरपालीका व 75 टक्के निधी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करण्यास मंजूरी दिली आहे. दर महिन्यात जिल्हाधिकारी व नगरपालीका यंत्रणा यांच्यासमवेत आढावा व पाठपुराव्यामुळे 20 वर्षापासून रखडलेले नाट्यगृहाचे काम पुर्णत्वास येवून जिल्ह्याच्या कला व सांस्कृतिक विकासात निश्चितच भर पडणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
मागील वर्षी यवतमाळचे पालकमंत्री म्हणून प्रभार स्विकारला आणि येथील विकास कामांना गती देण्याची काम हाती घेतले. यात सर्वप्रथम ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिला. तत्पर सेवेसाठी पोलीसांना वाहने उपलब्ध करून दिली. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा यंत्रणा आणि अद्यावत यंत्रसामग्री व मशनरी, तसेच तारांगण प्रकल्प, सावरगड डेपो हे सर्व विषय मार्गी लावले. अब्दुल कलाम अभ्यासीका सुरू केली. अमृत योजने अंतर्गत शहरातील पाणी पुरवठ्याचे 2017 पासून रखडलेले काम पुर्ण करण्यासाठी मागील एक वर्षात नियमित आढावा घेवून पाठपुरावा केला. यामुळे या योजनेचे दोन टप्पे पुर्ण झाले असून तीसरा टप्पा एक महिन्यात पुर्ण होणार आहे. अमृत योजनेचे काम त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले असून माहे मे अखेरपर्यंत या योजनेंतर्गत पाणी पुरवठा सुरू होईल. विकासाची कामे प्राधाण्याने घेण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात कायम विकासाची चर्चा करणारे कर्तबगार अधिकारी मिळाले असल्याने अर्धवट योजना मार्गी लागण्याचे काम होत असल्याचे ते असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. तसेच
जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी म्हणाले की पालकमंत्री यांनी मागील वर्षी दिलेल्या सूचनेनुसार पाठपुरावा करून नाट्यगृहाच्या अपुर्ण कामाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करवून घेतले. पुढील पाच महिण्यात काम पुर्ण व्हावे म्हणून दर 15 दिवसाच्या कामांचे उद्दिष्ट ठरवून त्याचा आढावा घेण्यात येईल. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित नाट्यगृहाचा विषय निधी उपलब्ध करून मार्गी लावल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी नाट्यगृहाची माहिती सादर केली तर माजी नगराध्यक्षा कांचन चौधरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते वाघापूर नाका ते हॉटेल गॅलक्सी पर्यंत रस्त्याचे गिट्टीकरण व डांबरीकरण व हॉटेल गॅलेक्सी ते मेडीकल कॉलेज गेटपर्यंत रस्त्याचे गिट्टीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन केंद्र येथे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 14 दुकानांचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, निरज नखाते, कृषी बचत गटाचे सदस्य शेतकरी, नगरपालीकेचे बांधकाम अभियंता वाय.देशमुख, डॉ. विजय अग्रवाल, तसेच इतर सबंधीत अधिकारी उपस्थित होते.