पुसदसाठी वाशीमला रॅक पॉईंट देण्याची मागणी मान्य :- पालकमंत्री संदिपान भुमरे ; खरीप हंगाम आढावा बैठक ; जिल्ह्यात 9 लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन ; कापसाचा पेरा वाढणार ; पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून द्या..….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि,1 मे :- शेती व शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते पेरणीपूर्वी उपलब्ध असणे हा अतिशय महत्वाचा विषय असून कृषि विभागाने याबाबत विशेष काळजी घ्यावी. तसेच पुसद आणि इतर तालुक्यांसाठी वाशीम येथे रॅक पॉईंट उपलब्ध करून देण्याबाबात सचिवांशी बोलणे झाले असून लवकरच वाशीम येथे खतासाठी रॅक पॉईंट उपलब्ध होईल असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार सर्वश्री नामदेवराव ससाणे, अशोक उईके, इंद्रनील नाईक, निलय नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर उपस्थित होते.
जिल्ह्यात यावर्षी 9 लाख 2 हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन असून मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यावर्षी कापसाचा पेरा वाढणार आहे. खरीप हंगामात 4 लक्ष 55 हजार हेक्टर कापूस, 2 लाख 83 हजार 235 हेक्टर सोयाबीन, तर 1 लक्ष 24 हजार 100 हेक्टरवर तूर पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सोयाबिनची 74 हजार 349 क्विंटल बियाण्यांची मागणी आहे तर 28 हजार 830 क्विंटल इतर बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच 2 लाख 15 हजार मेट्रिक टन खताची मागणी असून 53 हजार टन खत उपलब्ध आहे.
कृषि विभागाने ऐन हंगामात खते आणि बियाण्यांची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याबाबत पालकमंत्री यांनी निर्देश दिलेत. तसेच खताचे दैनंदिन देखरेख व नियंत्रण करावे. खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून यावर्षी कृषि विभाग खतांचा बफर स्टॉक करणार आहे. तसेच खत टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर करावा यासाठी प्रोत्साहित करावे व त्याबाबत योग्य माहिती शेतकऱ्यांना द्यावी अशा सूचना श्री भुमरे यांनी केल्यात.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देणे. जिल्हाधिकारी यांनी लीड बँक व्यवस्थापक आणि सर्व बँकांची बैठक घेऊन लोकप्रतिनिधींना त्यांच्या कार्यक्षेत्रात पीक कर्जबाबत येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. तसेच शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी पीक कर्ज उपलब्ध होईल यासाठी मेळावे घ्यावेत. कोणत्या गावासाठी कोणती बँक अधिसूचित केली आहे याची माहिती गावात दर्शनी भागात लावावी अशा सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केल्यात.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेती करण्यासाठी करावा. बीबीएफ तंत्रज्ञानाने पिकाची उत्पादकता वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसेच जिल्ह्यात कोणकोणत्या गावात बीबीएफ यंत्र उपलब्ध आहे याची माहिती शेतकरी आणि लोकप्रतिनिधीना द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
प्रतिबंधित कपाशी बियाण्यांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 16 भरारी पथकातील सदस्यांचे नाव, मोबाईल क्रमांक किंवा तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक इत्यादींबाबतची माहिती लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांना द्यावी. पीक विमा योजना कंपनीचे प्रतिनिधी आणि त्यांचे संपर्क क्रमांकाची माहिती सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे सांगितले.
यावेळी आमदार अशोक उईके, निलय नाईक, इंद्रनील नाईक, नामदेवराव ससाणे यांनी केलेल्या मागण्या पालकमंत्री पाणी लगेच मान्य करीत अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेत. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी पंप जोडणी देणे आवश्यक आहे. मात्र 2018 पूर्वीच्या जोडण्या अजून प्रलंबित आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी वीज विभागाला यावर्षी जास्त निधी देऊ असेही पालकमंत्री भुमरे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावर्षीच्या खरीप हंगामाचे नियोजन पॉवर पॉईंटद्वारे सादर केले.
या बैठकीला जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोळे, वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी तसेच कृषी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.