राज ठाकरे “हिंदू ओवैसी” ; संजय राऊतांच्या “त्या” विधानावर असदुद्दीन ओवैसीचं खोचक उत्तर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद, 30 एप्रिल :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या 1 मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा हाती घेतल्याने शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना तर ‘हिंदू ओवैसी’ असल्याची उपमा दिली. तसेच मनसे ही भाजपती सी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. दरम्यान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आज इफ्तार पार्टीच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये आले होते.
यावेळी त्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांच्या राज ठाकरे ‘हिंदू ओवैसी’ अशा उल्लेखाबाबत प्रश्न विचारला. त्यावर ओवैसी यांनी खोचक टोला लगावला. “माझ्या वडिलांचं नाव ओवैसी आहे. आता संजय राऊत असं का बोलत आहेत.
त्यांनी असं बोलायला नको. मी एवढंच बोलू इच्छितो. संजय राऊत ठाकरे घराण्याशी संबंधित व्यक्ती आहेत. आपल्या नेत्याच्या घराचा वाद माझ्यावर का काढत आहेत?
मला त्याच्याशी काय घेणंदेणं आहे? दोन भावंडांमध्ये भांडण आहे ना. दोघांना एकत्र बसवून त्यांना एकत्र करा. तुम्ही इतके दिवस भाजपसोबत हनिमून साजरी केलं ते काय होतं?
तुम्ही 2014 आणि 2019 ला मोदींना मत द्या म्हणाले. तुम्ही कलम 370 च्या निर्णयाला पाठिंबा दिला”, अशी टीका ओवैसींनी केली. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबतचा अल्टिमेटम दिला आहे. याबाबत ओवैसी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याबाबत प्रश्न विचारावं, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, एमआयएम पक्षाला भाजपची B टीम असल्याची टीका केली जाते. याबाबत ओवैसी यांना प्रश्व विचारला असता त्यांनी संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर दिलं. “तुम्ही आम्हाला बी टीम म्हणता. आम्ही डील केलं आणि आम्ही लढून शिवसेनेला हरवलं.
संजय राऊतांना त्याचा त्रास आहे. औरंगाबादच्या हिंदू, मुस्लिम, दलित जनतेने शिवसेनेचा पराभव केला. त्याचा राग संजय राऊत यांना आहे. त्याचा राग ते माझ्यावर काढतात”, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत ओवैसी यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आता काय बोलायचं?
ते आमच्या नावावरच द्वेश करतात. आमंच नाव ऐकून त्यांच्या पोटात दुखायला लागतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील मुस्लिम जनतेला धोका दिला. विधानसभेत बोलून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही बाबरी मशिद पाडलं, असं विधान करतात. या विधानाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार समर्थन देतील का? सत्तेत बसून गुलाबजाम खात आहेत”, असा घणाघात ओवैसी यांनी केला.