जरांगेंना रोखण्यासाठी फडणवीस हुकमी एक्का बाहेर काढणार? शिंदेंचा दौरा अचानक रद्द, गेम पलटणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईकडे निघाल्याने राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे. जरांगे यांच्यासोबत मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजबांधव मुंबईत दाखल होणार असल्याने प्रशासनावरील ताणही वाढणार आहे.
ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटील यांचं वादळ राजधानी मुंबईत धडकणार असल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता असून ही कोंडी फोडण्यासाठी काय करायला हवे, याबाबत विचारमंथन सुरू आहे. अशातच शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरे गावी होणारा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदेंना पुढे केले जाणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असताना पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या लढाईला धार आली होती. अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पाटील पेटून उठले आणि त्यांनी राज्यभरात रान पेटवलं. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना अत्यंत शिताफीने हे आंदोलन हाताळले. आपल्या विविध सहकाऱ्यांच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद प्रस्थापित केला. परिणामी आंदोलनासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे वाशी येथूनच सरकारच्या आश्वासनावर पुन्हा अंतरवालीकडे परतले होते.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आजही मुंबईकडे निघताना प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि एकनाथ शिंदे हा खरा माणूस असल्याचं सांगत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा आंदोलनाची कोंडी फोडत जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने आता उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत हे जरांगे यांच्या भेटीसाठी जाण्याची शक्यता आहे. याबाबत पुढील काही तासांत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..