भुजबळ-वळसे पाटलांना मंत्रिपद का नाही..? चाकणकरांनी सांगितलं खरं कारण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपुरात पार पडला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिपदासाठी नावे निश्चित करताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच उलथापालथ झाल्याचे दिसून आले.
दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिपदी संधी मिळालेली नाही. या प्रकाराची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छगन भुजबळांना मंत्रिपद का नाकारण्यात आलं असा प्रश्न विचारला जात असतानाच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यामागचं कारण सांगितलं.
आज नागपूर राजभवन परिसरात राज्यपालांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण यात छगन भुजबळ, धर्मरावबाबा अत्राम आणि दिलीप वळसे पाटील या ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्र्यांचं नाव नव्हतं. या नेत्यांना का संधी मिळाली नाही असा प्रश्न रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आला.
चाकणकर म्हणाल्या, आपण नेहमी म्हणतो की उद्याचे भवितव्य तरुणाईच्या हातात असते. आमच्या ४१ आमदारांमध्ये अनेक नवे चेहरे आहेत. त्यांना मतदारांनी पसंती दिली आहे. त्यामुळे कुणाला डावलले कुणाला थांबवले असा काही प्रकार नाही. वरिष्ठ नेत्यांनी स्वतःहून अजितदादांकडे भावना व्यक्त केली होती की नव्या नेतृत्वाला संधी मिळावी.
आजच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेच्या गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम आदींनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..