राज्यात काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल? हा बडा नेता पुन्हा एकदा दिल्लीत
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकर सुरू आहे तर दुसरीकडे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये काही मोठा बदल होण्याची चिन्ह असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खरंतर आधीही नाना पटोले हे दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मदतीवरूनही भाजपने महाविकास आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहेया राजकीय घडामोडीत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे आता दुसऱ्यांदा दिल्लीत पोहोचले आहेत. त्यामुळे काही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, याआधी दोन दिवस नाना पटोले हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची जबादारी दिली जाऊ शकते. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे.
बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषद निवडणुकीत दोन उमेदवार देण्याची भूमिका घेतली होती. दिल्ली हायकमांडकडून एक उमेदवार जाहीर झाला होता. तर बाळासाहेब थोरात यांनी आणखी एका उमेदवारीची घोषणा केली होती. त्यामुळे काही काळ महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी दुसरा उमेदवारी मागे घेऊन वादावर पडदा टाकला होता.