प्रथमच इतिहासात काँग्रेसचा बालेकिल्ल्या म्हणून ओळखल्या जाणारा जिल्ह्यातून काँग्रेस लोकसभेच्या रिंगणातून बाहेर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- काँग्रेसचा बालेकिल्ला, अभेद्य गड म्हणून कधी काळी देशभर ख्याती असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून अलिकडच्या काळात काँग्रेस हद्दपार झाली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाने संजय देशमुख यांना आज बुधवारी उमेदवारी जाहीर केली.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कायम रिंगणात राहणाऱ्या काँग्रेसला यावेळी प्रथमच महाविकास आघाडीतील समीकरणांमुळे रिंगणाबाहेर राहण्याची वेळ आली आहे. काँग्रेसला अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उरलेली एकमेव महत्वाची जागाही मित्रपक्षाकडे गेल्याने सच्चे काँग्रेस कार्यकर्ते मनातून हळहळत आहेत.
स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याने कायम काँग्रेसला साथ दिली आहे. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात इंदिरा गांधी यांच्याविरोधात वातावरण असताना यवतमाळातून इंदिरा गांधींना भक्कम बळ मिळाले. लोकसभेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपासून म्हणजे १९५७ पासून १९७१ मधील पाचव्या आणि १९९६ मधील अकराव्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता जिल्ह्यात १९९९ पर्यंतच्या १३ व्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यात १९८० पासून १९९९ पर्यंत केवळ १९९६ चा अपवाद वगळता उत्तमराव पाटील हे सहा वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत.
शरद पवार यांनी काँग्रेस फोडल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. किंबहुना गेल्या सहा दशकात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला यवतमाळ जिल्ह्यावर वर्चस्व मिळविता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसच्या संघटनाला खरा तडा बसला तो १९९६ मध्ये. अकराव्या लोकसभेसाठी काँग्रेसने उत्तमराव पाटील यांना तिकीट नाकारून येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते गुलाम नबी आझाद यांना उमेदवारी दिली. भाजपने हिच संधी साधून कुणबीबहुल मतांचे ध्रुवीकरण करत तेव्हा राज्याच्या युती सरकारमध्ये मंत्री असलेले राजाभाऊ ठाकरे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले. गुलाम नबी आझाद यांना धडा शिकविण्यासाठी उत्तमराव पाटील यांच्या समर्थकांनी राजाभाऊ ठाकरेंच्या पारड्यात आपली ताकद टाकली आणि भाजपच्या कुणबी कार्डचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र दोनच वर्षात निवडणुका लागल्या आणि १९९८ मध्ये काँग्रेसने पुन्हा उत्तमराव पाटील यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. १९९९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तमराव पाटील सहाव्यांदा विजयी झाले. २००४ मध्ये पुन्हा वारे बदलले आणि भाजपने या मतदारसंघात हरिभाऊ राठोड यांच्या रूपाने बंजारा कार्ड पुढे केले. हरिभाऊ राठोड यांनी काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर मात्र यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसची पकड सैल होत गेली.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००८ मध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ पासून या मतदारसंघावर शिवसेनेचा झेंडा आहे. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये येथे शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्या. मात्र शिवसेना फुटल्यानंतर भावना गवळी या शिवसेना शिंदे गटाबरोबर गेल्या. त्यामुळे यावेळी प्रथमच या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचा उमदेवार आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात राहणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..